लोकसत्ता ऑनलाइन, वसई

वसई पूर्वेतील तुंगारेश्वर डोंगरावरील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमावर गुरुवारी दुपारपासून तोडक कारवाईला सुरुवात केली असल्याने संतप्त झालेल्या भाविकांनी या कारवाईच्या निषेधार्थ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी सकाळी महामार्ग रोको आंदोलन करत रास्ता रोको केला. हा रास्ता रोको घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल जवळ करण्यात आला. या आंदोलनात वसई विरार, मीरा भाईंदर, ठाणे या ठिकाणांहून हजारोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरले होते. भजन कीर्तन करत त्यांनी निषेध व्यक्त केला. या रास्ता रोकोमुळे मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

कारवाई करण्यासाठीची देण्यात आलेली मुदत संपत आल्याने दोन दिवसांपासून वन विभागाने हालचाली सुरू केल्या होत्या. कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बुधवारपासून सुमारे तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तुंगारेश्वर डोंगरानजीक तैनात करण्यात आला होता. गुरुवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने तोडकामाला सुरुवात केली आहे.

या आश्रमावर होणारी कारवाई थांबविण्यासाठी आश्रम संस्थेच्या वतीने नुकताच राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी याबाबत न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र सुनावणी झाली नसल्याने त्यावर अजूनही निर्णय झाला नाही. याबाबत २ सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी शुक्रवारी होणार आहे. मात्र याबाबत वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला ही विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडे कारवाई स्थगित करण्यात यावी असा कोणताही आदेश नसल्याने अखेर कारवाईची सुरवात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या कारवाईनंतर विरार, मीरा-भाईंदरमधील राई, मोर्धा आणि मोरवा गावांतील अनेक भाविक रस्त्यावर उतरले. या कारवाईचा त्यांच्याकडून निषेध करण्यात आला. या कारवाईमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.