डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर प्रवेशद्वार व स्वच्छतागृहाजवळ नियमबाह्य़पणे रस्ते अडवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही रिक्षा चालकांना वारंवार समज देऊनही अडवणूक करणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने रद्द करण्याची शिफारश आता केली जाणार आहे. वाहतूक विभागाने अशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. रिक्षा चालकांकडून मोटार वाहन कायद्याप्रमाणे बुधवारी सुमारे १० ते १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विष्णुनगर प्रवेशद्वार अडवून, भर रस्त्यावर रिक्षा उभ्या करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकूण १३ रिक्षा डोंबिवली पश्चिम वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या पथकाने जप्त केल्या. या सर्व ताब्यात घेतलेल्या रिक्षा वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आल्या. या रिक्षा चालकांचे परवाने, नूतनीकरण, बिल्ला यांची इत्थंभूत छाननी करण्यात आली. या छाननीत अनेक रिक्षा चालकांच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून आली. काही रिक्षा चालक गणवेश न घालता प्रवासी वाहतूक करीत होते. काहींनी गणवेशला बिल्ला लावला नव्हता. काही रिक्षा चालकांनी प्रवासी भाडे नाकारले असल्याचे स्पष्ट झाले. या तेरा रिक्षा चालकांनी ज्याप्रमाणे गुन्हे केले आहेत त्याप्रमाणे त्यांच्याकडून ८०० रुपयांपासून ते १४०० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला, असे दिलीप चव्हाण यांनी सांगितले.