|| निखिल अहिरे दरांत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ; उत्पादनात घट आणि इंधन दरवाढीचा परिणाम ठाणे : मार्च महिन्याच्या मध्यानंतर गृहिणींची वर्षभराकरिता मसाला बनविण्याची तयारी सुरू होते. याकाळात लाल मिरची तसेच गरम मसाल्याच्या जिन्नसांना मोठी मागणी असते. दरम्यान लाल मिरचीच्या उत्पादनात झालेली घट आणि इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च यामुळे यंदा संकेश्वरी, बेडगी, पांडी, काश्मिरी तसेच लवंगी मिरचीच्या दरांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून धने, लवंग, दालचिनी यांसारखे जिन्नसही महागले आहेत. त्यामुळे यंदा लाल मसाला गृहिणीसाठी किमतीला चांगलाच तिखट ठरण्याची चिन्हे आहेत. मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत उन्हाचा तडाखा जास्त असल्याने हा काळ लाल मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो. यासाठी मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान ग्राहकांची मिरच्या खरेदी करण्यासाठी मसाला बाजारात मोठ्या संख्येने गर्दी होत असते. या काळात संकेश्वरी, बेडगी, लवंगी, काश्मिरी, पांडी या मिरच्यांना मोठी मागणी असते. महाराष्ट्रसह, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतून या मिरच्या मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारांत फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी दाखल होतात. यंदाही या मिरच्या बाजारात दाखल झाल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या मिरच्यांच्या दरांत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे या मिरच्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या उत्पादनात घट झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा बाजारात मिरच्यांची आवक रोडावली असून त्यांच्या दरात वाढ झाली असल्याचा दावा किरकोळ मिरची विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. गरम मसालाही महागला गरम मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या धणे, खसखस, दगडफूल, लवंग, दालचिनी, तेजपत्ता या जिन्नसांच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी ७५ रुपये ते १ हजार १२५ रुपये प्रति किलोने विकले जाणारे हे जिन्नस यंदा १०० रुपये ते १ हजार ५०० रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. मिरच्यांच्या दरवाढीचा परिणाम या जिन्नसांवर झाला आहे, अशी माहिती विक्रेते हिमांशू अग्रवाल यांनी दिली. अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी झाले आहे. त्याचबरोबर इंधनाच्या दरामध्ये वाढ झाल्याने वाहतुकीचा खर्च महागला आहे. यामुळे यंदा लाल मिरचीच्या दरांत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. - अर्जुन वाघेला, किरकोळ मिर्ची विक्रेते, ठाणे गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल मिरचीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम यंदा मिरचीच्या दरामध्ये झालेला दिसून येत आहे. - के. आर. पवार, उपसचिव, मसाला मार्केट, वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती