ठाणे : ठाणे, नवी मुंबई परिसराला मंगळवारी संध्याकाळनंतर परतीच्या पावसाने झोडपले. अतिवेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे देवी विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांवर विघ्न आले.   मंगळवारी रात्री  नऊ  वाजता जिल्ह्य़ाच्या ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी तसेच ग्रामीण भागात  जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. डोंबिवली पश्चिम भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.  ठाण्यात दोन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.  नवी मुंबईतही वीजांसह पाऊस पडला.