ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या पथकाने गेल्या सहा दिवसांपासून कारवाई सुरू केली असून त्यामध्ये पथकाकडून मारहाणीचे प्रकार घडल्याने शहरात आयुक्तांच्या कारवाईबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर सोमवारी सायंकाळी आयुक्त जयस्वाल यांनी ठाणे स्थानक परिसर आणि बाजारपेठेतील फेरीवाल्यांविरोधातील कारवाईदरम्यान नागरिकांशी संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी कारवाईबाबत नागरिकांची नेमकी काय मते आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांना पाच दिवसांपूर्वी फेरीवाल्यांनी कारवाईदरम्यान मारहाण केली होती. या घटनेनंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. त्या वेळेस फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांनाही त्यांनी चोप दिल्याचा प्रकार घडला होता. तसेच गेल्या पाच दिवसांपासून आयुक्त जयस्वाल हे शहराच्या विविध भागांत जाऊन फेरीवाल्यांवर कारवाई करीत आहेत. मात्र, या कारवाईदरम्यान फेरीवाल्यांना मारहाणीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर शहरातील नागरिकांचा कारवाईबाबत नेमका सूर काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आयुक्त जयस्वाल यांनी सोमवारी सायंकाळी ठाणे स्थानक परिसर आणि बाजारपेठेत नागरिकांशी संवाद साधला. आम्ही जी कारवाई करतो आहे, ती योग्य आहे का, असा सवाल करत त्यांनी नागरिकांची मते जाणून घेतली. तसेच रस्त्यामध्ये बेकायदा उभ्या केलेल्या रिक्षा हटविण्याच्या सूचना त्यांनी चालकांना केल्या. त्यास चालकांनीही प्रतिसाद देत रिक्षा तेथून हटविल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधात कमालीचे आक्रमक झालेले आयुक्त जयस्वाल हे सोमवारी मात्र नरमाईच्या भूमिकेत दिसून आले.