विद्यार्थी वाहतूक सुरक्षिततेसाठी परिवहन कार्यालय सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे; परंतु शाळांचीही तेवढीच जबाबदारी असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थी वाहतूक समिती स्थापन करावी. या समितीचा लेखी अहवाल परिवहन अधिकाऱ्यास सादर करावा, असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांनी येथील कार्यक्रमात केले. रिलायबल ऑटोटेक डोंबिवली व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांच्या वतीने कामा हॉल येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महेश फडणीस, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, प्रशांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ व बदलापूर येथील शाळेचे १२० चालक या वेळी उपस्थित होते. नाईक यांच्या हस्ते उत्कृष्ट चालकांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. मार्गदर्शक फडणीस यांनी त्यांच्या सत्तावीस वर्षांचा वाहन क्षेत्रातील अनुभव या ठिकाणी व्यक्त केला तसेच सुरक्षित वाहन कसे चालवावे याविषयी माहिती दिली. तर सूर्यकांत गंभीर यांनी विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळेत विद्यार्थी वाहतूक समिती अद्याप ज्यांनी स्थापित केली नाही त्यांनी त्वरित स्थापित करावी, असे आवाहन केले. सदर समितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक वाहतूक पोलीस अधिकारी, चालक प्रतिनिधी व एक पालक प्रतिनिधी नेमण्याची विनंती केली. तसेच समितीने वर्षांतून कमीतकमी तीन सभा घेतल्या पाहिजेत. त्या सभांचा लेखी अहवाल प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यास सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तर प्रशांत शिंदे यांनी विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारची मदत करण्यास परिवहन कायम तत्पर असल्याचे सांगितले.