धुळवडीनिमित्त वसईतील बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री कीर्ती केसरकर, विरार राज्यात प्लास्टिकबंदी असली तरी धुळवडीनिमित्त या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. धूलिवंदन सणानिमित्त अनेक जण प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये रंगीत पाणी भरून ते फेकतात. प्लास्टिकबंदी असली तरी या पिशव्यांची वसई-विरारमधील बाजारात सर्रास विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. महापालिका मात्र आमची कारवाई सुरू आहे, असे साचेबद्ध उत्तर देत आहे. रंगांचा सण असलेले धूलिवंदन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या सणानिमित्त अनेक जण रबरी फुगे आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये रंगीत पाणी भरून ते एकमेकांवर फेकतात. प्लास्टिकबंदी असल्याने यंदा या पिशव्यांचा वापर केला जाणार नाही, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. वसईच्या बाजारापेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या विक्रीसाठी आल्या असून ग्राहकांकडूनही त्याची मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे. दुकानात आणि जागोजागी धुळवडीच्या साहित्याच्या विक्रीचे स्टॉल उभे राहिले असून त्यात या पिशव्यांची विक्री सुरू आहे. आम्ही घाऊक दरात प्लास्टिक पिशव्या विकत घेत असतो. यंदा प्लास्टिकबंदी असल्याने या पिशव्या महाग असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी या पिशव्यांची मागणी जास्त आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. प्लास्टिकच्या या पिशव्या अतिशय पातळ आणि पर्यावरणासाठी तितक्याच हानीकारक असतात. या पिशव्या १० रुपयांना २५ अशा किमतीत विकल्या जातात. लहान मुलांचे हे खास आकर्षण असल्याने याची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून या पिशव्यांची विक्री आणि वापर सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. दर वर्षी पाच हजारांहून अधिक पिशव्या आमच्या दुकानातून विकल्या जातात. १५ दिवस अगोदरच मागणी सुरू झालेली असते. प्लास्टिकबंदी असली तरी पिशव्यांच्या मागणीत काही बदल झालेला नाही. मागणी जोरदार आहे, तर होळीसाठी आतापासून ग्राहक प्लास्टिक पिशव्या घेत आहे. - विना साठे, दुकानदार. प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे हे मान्य आहे, मात्र कारवाईही सुरू आहे. पालिकेचे पथक फिरतीवर असून वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांनाही शोधून काढू. - वसंत मुकणे, पर्यावरण विभाग अधिकारी