आजच्या एकंदरीतच उद्योगजगतातील मागणी-पुरवठा तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नेमके काय आवश्यक आहे याची माहिती करून देण्यासाठी ठाण्याच्या एमकॉस्ट व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक कल’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये विपणन, मानवी संसाधने, अर्थ तसेच त्यासाठी उपयुक्त आणि पूरक अशा माहिती तंत्रज्ञानासंबंधी अनेक पैलूंवर माहिती देण्यासाठी व्यवस्थापन जगतातून अनेक नामांकित तज्ज्ञ हजर होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कोणताही उद्योग सहज ग्राहककेंद्रित होऊ शकतो; परंतु आजच्या युगात पुरवठय़ापेक्षा मागणी व्यवस्थापन जास्त महत्त्वाचे असून व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या विषयाचा खोलवर अभ्यास करायला हवा, असे प्रतिपादन करून संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. इर्शाद काझी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रिलायन्स इंडस्ट्रीचे अब्दुल खान, सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर पूजा नाडकर्णी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे व संगणक कक्षाचे मुख्य विनय जोशी आदी मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित होती. तसेच या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. इर्शाद काझी, वर्षां परब आणि व्रित्ते पारख लिखित व्यवस्थापनाचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्य या इंग्रजी पुस्तकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. यानंतर व्यवस्थापन क्षेत्र जगतातील नामांकित तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विनय जोशी यांनी सॉफ्टवेअरची अंमलबजावणी आणि सुयोग्य वापर कसा करावा, त्याचे फायदे आणि त्यातील विविध विभाग यांवर मार्गदर्शन केले. डॉ. विजय खोले यांनी पुरवठा साखळीचा इतिहास उलगडून सांगितला. आजच्या युगात संक्रमण हे उपयुक्त आहे आणि पुरवठा साखळीचे संक्रमण होणे ही काळाची गरज आहे आणि या सगळ्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच अचूकता, असेही ते म्हणाले. डॉ. विष्णू मगरे यांनी मागणी आणि पुरवठा साखळी, वाहतूक व्यवस्था यातील आव्हाने याविषयी माहिती दिली. निरनिराळ्या प्रकारे ग्राहकांची मागणी पूर्ण कशी करता येते, त्याला जोडून निरनिराळ्या मूल्य धोरणांची आणि जाहिरातींची आवश्यकता कशी भासते, त्यासोबतच ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करताना पुरवठा साखळीची क्षमता कशी असावी इत्यादी गोष्टींवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. २०२५ साली भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश असेल आणि आजच्यापेक्षा कित्येक पटीने महानगरे येथे असतील. आज भारतात १७० प्रकारची वाहने आहेत, परंतु २०२५ साली भारतात ६७० प्रकारची वाहने दृष्टीस पडतील. या वेळी भारत हा निर्यातीचे प्रमुख केंद्र बनेल, असे प्रतिपादन डॉ. काझी यांनी या वेळी बोलताना केले. एखादी उद्योगसंस्था ते ग्राहक यांच्यातील साखळी उलगडून सांगताना, आजची प्रक्रिया ही मागणीचा अंदाज घेण्याची आहे, परंत आणखी दहा वर्षांनंतर मागणी अचूकपणे जाणून घेण्याची क्षमता आपल्याकडे असेल, असे ते म्हणाले. या चर्चासत्राचे आयोजन करण्यात एमकॉस्ट व्यवस्थापन महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक आणि आयटीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.