भाजपचे कल्याणचे माजी खासदार, अंदमान व निकोबारचे माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे यांचे मंगळवारी पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यानंतर त्यांना विस्मरण आजाराने ग्रासले होते. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी त्यांचे अन्त्यदर्शन घेतले. लालचौकी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात आले. अभ्यासू लोकनेता असा त्यांचा लौकीक होता. कल्याण आणि डोंबिवलीचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. मुंबई ते कल्याण थेट दूरध्वनी सेवा, डोंबिवली उपनगरी सेवा सुरू करणे, आरेचे दूध कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू करावे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. कुशल संघटक, उत्तम वक्ता! रूपारेल महाविद्यालयात प्राध्यापक असलेले रामभाऊ कापसे राजकारणात आले तेव्हा त्यांच्या राजकारणात संस्कारित शिक्षकी पेशाचे प्रतिबिंब उमटले होते. आदर्श लोकप्रतिनिधी, अभ्यासू आमदार, खासदार, उत्तम वक्ता आणि संघटक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. जव्हार त्यांचे जन्मगाव होते. कल्याण नगरपालिकेत १९६२ मध्ये ते नगरसेवक होते. त्यानंतर विधानसभेची निवडणूक लढवून ते दोन वेळा कल्याण विभागाचे आमदार होते. विधानसभेत पक्षाचे तीन वेळा गटनेते होते. दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे नवी दिल्लीत प्रतिनिधित्व केले. अडीच वर्षे ते राज्यसभा सदस्य होते. या लोकप्रतिनिधीपदाच्या काळात त्यांनी आपल्या अभ्यासू भाषणांनी अनेक विषय मार्गी लावले. राजकीय निवृत्तीनंतर ते अडीच वर्षे अंदमान व निकोबारचे नायब राज्यपाल होते. ध्येयपूर्तीसाठी वाहून घेतलेला एक ध्येयनिष्ठ मागदर्शक हरपला आहे. राम कापसे हे राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी झटले. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री विचारांशी कटिबध्द असलेले ते व्यक्तिमत्त्व होते.कार्यक्षम, लोकाभिमुख व लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. - रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष