पुनर्विकसित होत असलेल्या इमारतीतील घरासाठी मधुकर जोशी यांना २० लाखांची गरज ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘या लाडक्या मुलांनो’, ‘माती सांगे कुंभाराला’, ‘एक धागा सुखाचा’, ‘अशीच अमुचि आई असती..’ अशी अनेक अजरामर गीते रचून मराठी रसिकांच्या मनात कायमचे घर करून राहिलेले ज्येष्ठ गीतकार मधुकर जोशी यांच्यावर वृद्धापकाळात घरासाठी दाहीदिशा हिंडण्याची वेळ आली आहे. मधुकर जोशी व त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या इमारतीचा पुनर्विकास होणार असून नव्या घरासाठी जोशी यांना २० लाख रुपये भरावे लागणार आहेत; परंतु नोकरीच्या निवृत्तिवेतनातून जोशी कुटुंबाची कशीबशी गुजराण होत असताना एवढी मोठी रक्कम कुठून आणायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. पूर्वी विष्णुनगरमध्ये चाळीत राहणारे जोशी कुटुंबीय सध्या दत्तनगरमधील हेरंब सोसायटीत भाडय़ाने राहतात. या ठिकाणी सध्या मधुकर जोशी, त्यांची पत्नी मालती, मुली अंजली व अलकनंदा राहतात. डॉक्टर असलेला मुलगा शिरीष दुसरीकडे राहतो. हेरंब सोसायटीची इमारत मोडकळीस आली असल्याने तिचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यासाठी जोशी यांना २० लाख रुपये भरायचे आहेत. मात्र, निवृत्तिवेतनातूनच कशीबशी गुजराण होत असल्याने हे पैसे कुठून उभे करायचे, असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. ‘‘आता या वयात ही जागा सोडण्याची आमची इच्छा नाही. मात्र नाइलाजास्तव दुसरी जागा शोधावी लागत आहे,’’ अशी खंत मालती जोशी यांनी व्यक्त केली. मागे एकदा शासकीय कोटय़ातून घर मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यश आले नाही, असेही त्यांनी सांगितले. पाच हजारांहून अधिक गीते ८६ वर्षीय मधुकर जोशी आता वयोमानानुसार थकले आहेत. श्रवणशक्तीही कमी झाली आहे. त्यांचा आवाज मात्र खणखणीत आहे. स्मरणशक्तीही दांडगी असल्याने शहरातील समकालीन पु.भा. भावे, शन्ना नवरे, प्रभाकर अत्रे यांच्या आठवणी सांगण्यात ते रमून जातात. पु. ल. देशपांडे यांचेही त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते. पाच हजारांहून अधिक गाणी, आकाशवाणीसाठी २० हून अधिक संगीतिका, शंभर गझला लिहिल्या. माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेवरून त्यांनी संपूर्ण शिवचरित्र ६९ गीतांमध्ये लिहिले होते.