ढिसाळ नियोजनाचा पाणीपुरवठय़ाला फटका बदलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बदलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ाला बसत असून ऐन ऑक्टोबर महिन्यामध्येच शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पश्चिमेतील मांजर्ली, वालिवली, वडवली, मोहनानंदनगर तर पूर्वेतील कात्रप, शिरगाव या भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भीषण बनली आहे. बदलापूर शहरातील पाणीटंचाई आता उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. बदलापूर शहरातील पश्चिम भागात मांजर्ली, वालिवली, वडवली, मोहनानंद नगर तर पूर्व भागात कात्रप, शिरगाव, आपटेवाडी, बेलवली या भागात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारीही बहुतांश भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातत्याने महावितरणाच्या कारभाराचा फटका बसत असल्याचा आरोप करत आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत असतानाही विविध भागातील जलकुंभ भरत नसल्याने पाणी कमी दाबाने येत असल्याचे नागरिक सांगतात. पाणीप्रश्न पालकमंत्र्यांच्या दारी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात नागरिकांच्या पाणी प्रश्नाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत असल्याने विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. येत्या मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली आहे.