कळवावासीयांच्या रोषावर उतारा शोधण्याचा प्रयत्न भर नागरी वस्तीत मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी होत असल्याने ठाणे महापालिका प्रशासन कळवा पारसिकनगर परिसरातील रहिवाशांच्या रोषाचे धनी ठरले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या या रोषाची तीव्रता कमी व्हावी म्हणून पालिकेने भविष्यात उभ्या राहणाऱ्या या प्रक्रिया केंद्रावर अद्ययावत उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा रोष कमी व्हावा यासाठी हा खटाटोप केला जात असल्याची चर्चा आहे. केंद्रातील तत्कालीन आघाडी सरकारने आखलेल्या जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेले भुयारी गटार योजनेचे अनेक प्रकल्प यापूर्वीच वादग्रस्त ठरले आहे. ठरावीक वेळेत या प्रकल्पांची कामे पूर्ण न झाल्याने कोटय़वधी रुपयांच्या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र या प्रकल्पाची नव्याने आखणी करत कळवा तसेच इतर उपनगरांमधील रखडलेल्या योजनांना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कळवा-पारसिकनगर भागात मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, भर वस्तीत उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प स्थानिक रहिवाशांच्या रोषाचे कारण बनला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवकही कोंडीत सापडले आहेत. आयुक्त जयस्वाल यांनी नव्याने उभ्या राहात असलेल्या मलनि:सारण केंद्रास उद्यानाचे आच्छादन देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अभियांत्रिकी विभागाला दिले असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या नियोजित उद्यानाच्या चर्चेने जोर धरला आहे. यासंबंधी महापौर संजय मोरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी अशा प्रस्तावाबद्दल अद्याप कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. वादग्रस्त निर्णय या मलनि:सारण प्रक्रिया केंद्राची निविदा काढताना जमीन आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. ज्या ठिकाणी हे केंद्र प्रस्तावित आहे तिथे वाहनतळाचे आरक्षण आहे. आरक्षण बदलाची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच संबंधित ठेकेदारास कामाची रक्कम आगाऊ देणे, जिल्हाधिकारी कार्यालयात जमिनीच्या हस्तांतरासाठी कोटय़वधी रुपयांचा भरणा करणे असे महापालिकेने यापूर्वीच घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाने केंद्राच्या उभारणीस तात्पुरती स्थगिती दिली आहे. तरी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत मध्यंतरी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जमीन आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर करवून घेतला. त्यामुळे या मुद्दय़ावरून पारसिकनगर परिसरात जोरदार राजकारण सुरू झाले असून निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अडचणीत आणण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस खेळत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना नेत्यांनी या मुद्दय़ावर आयुक्त जयस्वाल यांची भेट घेत मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यातून हा उद्यानाचा पर्याय पुढे आला आहे.