अंबरनाथ येथील मांगरुळ येथे शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या झाडांकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने काही समाज कंटकांनी या झाडांना आग लावल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच याचा जाब विचारण्यासाठी मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर शिवसेनेने सोमवारी धडक दिली आणि मोठा गोंधळ घातला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या देखत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वनाधिकाऱ्यांच्या तोंडाला राख फासली. दरम्यान, संबंधीत वनक्षेत्रपाल चंद्रकांत शेळके यांचे निलंबन करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. त्याचबरोबर खासदार शिंदे यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिवसेना आणि विविध सामाजिक संस्थांनी लोक सहभागातून मांगरूळ येथे लावलेल्या १ लाख झाडे वन अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नष्ट झाली आहेत. वन विभागाने या झाडांकडे लक्ष न दिल्याने समाजकंटकांनी येथे आग लावून ही झाडे पेटवून दिली आहेत. त्यामुळे या घटनेचा जाब विचारण्यासाठी आणि याला जबाबदार असलेल्या वनाधिकारी आणि समाज कंटकांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

दरम्यान, वनराई पेटविल्याप्रकरणी संतप्त झालेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी राख झालेल्या झाडांची राखच वनाधिकाऱ्यांना तोंडाला फसली. या प्रकारामुळे काही काळ येथील वातावरण तंग झाले होते. दरम्यान, तेथे उपस्थित पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून झाडे जाळण्याचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या सहा महिन्यात तब्बल ९ हेक्टर जागेवर नवी रोपे पेटवली गेली. आम्ही एक लाख झाडे लावली मात्र, वनखात्याचे त्याच्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे झाडे नष्ट झाली. आग लावण्याची ही दुसरी वेळ आहे. वन खाते जर लक्ष देऊ शकत नसेल तर १३ कोटी वृक्ष लावण्याच्या उपक्रमचा उपयोग नाही, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.