उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने अवघ्या अडीच वर्षात भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई आशान विराजनमान झाल्या आहेत. लिलाबाई आशान यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. राज्यात आकाराला येत असलेल्या नव्या आघाडीचा परिणाम पालिकेतही पाहायला मिळाला. खुल्या गटासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदासाठी भाजपाकडून सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर साई पक्षाकडून उपमहापौरपदावर असलेले जीवन इदनानी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

उल्हासनगर महापालिकेत २०१७ मधील निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला सोबत न घेताच पहिल्यांदा टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली होती. गेली अडीच वर्षे कलानी कुटुंबीयांना हाताशी धरत महापालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला महापौर पदाच्या निवडणुकीत आव्हानांचा सामना करावा लागणार हे निश्चित मानलं जात होतं. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने आक्रमक झालेल्या कलानी कुटुंबाच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेशी जवळीक वाढवली होती. तर, पालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांना महापौर पद देण्याची तयारी दर्शवली होती.

आणखी वाचा- पुण्याच्या महापौरपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची निवड

उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे ३१ नगरसेवक आहेत. भाजपाला महापालिकेत साई पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा होता. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी ४० नगरसेवकांच्या बहुमताचा आकडा गाठणे या पक्षाला शक्य झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर एकूणच राज्यातील आणि उल्हासनगरातील राजकारण वेगळ्या वळणावर येऊ न ठेपले आहे.