गायिका बेगम परवीन सुलताना यांचे प्रतिपादन शास्त्रीय संगीताला महाराष्ट्रातील रसिकांनी जिवंत ठेवले आहे. गायक जेव्हा गाणे गातो तेव्हा येथील रसिक नुसते गाणे ऐकत नाहीत तर त्या गाण्याच्या स्वादिष्ट पदार्थाप्रमाणे आस्वाद घेतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका बेगम परवीन सुलतांना यांनी ठाण्यात केले. भारततरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानभास्कर पं. माधव गुडी यांच्या स्मरणार्थ सहयोग मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वर हवीस संगीत महोत्सवात त्या बोलत होत्या. या वेळी भीमसेन जोशी यांनी त्यांच्यासाठी खास लिहून घेतलेल्या ‘रसिका तुझ्यासाठी..’ या गाण्याचे त्यांनी सादरीकरण केले. ठाण्यातील युनिव्हर्सल इव्हेंट हब संस्थेतर्फे आयोजित स्वर हवीस संगीत महोत्सवात ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमामध्ये गाणी सादर करत असताना त्यांनी ठाणेकर रसिकांसोबत गप्पांची मैफलही रंगवली. भीमसेन जोशी यांच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, भीमसेन जोशी त्यांच्यासाठी मोठय़ा भावाप्रमाणे होते. त्यांची महाराष्ट्रातील पहिली मैफल पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात झाली होती. त्यावेळी रसिका तुझ्यासाठी हे त्यांचे पहिले मराठीतील गाणे होते. या आठवणींना उजाळा देऊन सुलताना यांनी महाराष्ट्रातील रसिकतेचा गौरव केला. आपल्या पहिल्या बंदिशीचे कौतुक करताना पंडितजींचे भरपूर प्रगती कर आणि लिखाणात सातत्य ठेव, हे कौतुकाचे शब्द आणि त्यांनी दिलेल्या साडीच्या भेटीची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. भारतातील सांस्कृतिक विविधतांचा मान राखणे गरजेचे असून त्या कलांचे जतन केले गेले पाहिजे. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा आदर सन्मान करणे तितकेच महत्त्वाचे असते. आधुनिक तेचे अनुकरण जरूर करा, मात्र त्याचबरोबर आपली संस्कृतीही जपा. कलाकारांना बांधून ठेवू नका, असे भीमसेन जोशी नेहमी सांगत आणि त्याचा प्रत्यय वेळोवेळी आला. एखाद्या कलाकाराला स्वत:च्या कलेमध्ये पारंगत व्हायचे असेल तर त्यांचा सल्ला प्रत्येक नवोदित कलाकारांने स्वीकारणे गरजेचे आहे. एखाद्या चित्रकारासमोर कोरा कागद जेव्हा समोर ठेवतो तेव्हा चित्रकाराला माहीत नसते तो काय चित्र काढणार आहे. पण त्या कोऱ्या कागदामुळे त्याची विचार करण्याची क्षमता मात्र जरूर वाढते. संगीताच्या साधनेत कुठलेही घेणे-देणे नसून फक्त गुरूला वंदन करणे महत्त्वाचे आहे. गुरूसमान असणाऱ्या आई-वडिलांनाही जरूर वंदन करा, असा संदेश त्यांनी रसिकांना दिला. रसिकांच्या मनाचा योग्य ठाव घेत त्यांनी या वेळी गुजर तोडी, मेघ मल्हार आदी रागांचे गायन केले.