पिंपळेश्वर येथील गॅस पंप लवकरच कार्यन्वित
डोंबिवलीत ‘संपृक्त नैसर्गिक गॅस’ (सीएनजी) पंप सुरू करण्यासाठी महानगर गॅसकडे या भागातील काही व्यावसायिकांनी सहा प्रस्ताव दाखल केले आहेत. मंजुऱ्यांच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, टप्प्याने हे पंप सुरू करण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील एक ‘सीएनजी’ पंप सागाव येथील पिंपळेश्वर भागात सुरू करण्यात येत आहे. या पंपाची तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर लवकरच तो सुरूकरण्यात येणार आहे, अशी माहिती ‘महानगर गॅस’मधील एका वरिष्ठ सूत्राने दिली.
डोंबिवलीत गेल्या सहा महिन्यापासून सागाव येथील पिंपळेश्वर हॉटेलजवळ ‘सीएनजी’ पंप सुरू होणार असल्याने, रिक्षाचालक, चारचाकी वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. डोंबिवली परिसरात एकही ‘सीएनजी’ पंप नसल्याने रिक्षाचालकांना कल्याण, कोन (भिवंडी), महापे किंवा अंबरनाथ येथे जावे लागते. तेथे गॅस भरण्यासाठी रांगा लागत असल्याने, रिक्षाचालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. कल्याण, कोनमध्ये गॅस पंपावर काही भाई दमदाटी करून रिक्षाचालकांकडून हप्ता वसुली करतात. डोंबिवलीत सीएनजी गॅस पंप सुरू झाला तर, बाहेरच्या भागात गॅस भरण्यासाठी गेल्यावर होणारा त्रास कित्येक प्रमाणात कमी होईल. तसेच, गॅस भरणा करण्यासाठी जाणारा अर्धा दिवस वाचून, तेवढा वेळ डोंबिवलीत रिक्षा व्यवसाय करता येईल, असे वाहतूकदार व जागृत भारत सेवक संस्थेचे प्रशांत रेडिज यांनी सांगितले.
डोंबिवलीत सागाव येथील पिंपळेश्वर भागातील सीएनजी पंप तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. हा पंप सुरू होण्यात आता कोणतेही अडथळे नाहीत. डोंबिवलीत सीएनजी पंप सुरू करण्यासाठी महानगर गॅस कंपनीकडे एकूण सहा प्रस्ताव दाखल आहेत. जागेची उपलब्धता, पंप सुरू करण्यासाठीच्या परवानग्या यामध्ये वर्षभराचा काळ निघून जातो. त्यामुळे पंपांची कामे सुरू करण्यात अडथळे येतात, असे महानगर गॅसमधील सूत्राने सांगितले. कल्याण डोंबिवलीतील अधिकाधिक व्यावसायिकांनी सीएनजी पंपाची एजन्सी घेण्यासाठी पुढे यावे, म्हणून कंपनीकडून गेल्या तीन वर्षांपासून जाहिरातींच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला व्यावसायिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. डोंबिवलीत जमिनींच्या किमती गगनला भिडल्या आहेत. जागा, पंप सुरू करण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही गणिते मांडून व्यावसायिक पुढे येत नाहीत. त्यात मोठय़ा मुश्किलीने सागाव येथील जागा कंपनीला पंपासाठी मिळाली आहे. डोंबिवलीतील पंप रामेश्वर व्यावसायिकाला चालविण्यास देण्यात आला आहे. कल्याणमध्ये जमिनींचे भाव सर्वाधिक आहेत. जमिनीपासून ते पंप सुरू करेपर्यंत सुमारे पाच ते सहा कोटीची गुंतवणूक करावी लागत असल्याने, व्यावसायिक पंप सुरू करण्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी पुढे येत नाहीत, असे सूत्राने सांगितले.

रिक्षाचालकांना फायदा
डोंबिवलीत सीएनजी पंप सुरू झाल्यामुळे रिक्षाचालकांना महापे, कोन, कल्याण, अंबरनाथ येथे जावे लागत होते. त्यांचा तो त्रास वाचणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आता प्रत्येक रिक्षा सीएनजी करण्यात आली आहे. या पंपांची खूप गरज आहे. डोंबिवलीत सुमारे सहा ते सात हजार रिक्षाचालक आहेत. या रिक्षाचालकांना यापुढे अन्य शहरात सीएनजी भरण्यासाठी जाण्याची गरज लागणार नाही. तसेच, प्रस्तावित सहा पंप सुरू झाले तर, पंपांवर रांगा लावण्याची गरज लागणार नाही, असे रिक्षाचालक-मालक संघटनेचे सरचिटणीस शेखर जोशी यांनी सांगितले.