इमारत पायाभरणीसाठी माफियांकडून चोरी; म्हाडाचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र कल्याण : कल्याण-डोंबिवली शहर, २७ गावे हद्दीत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत, अधिकृत इमारतींची कामे सुरू आहेत. बहुतांशी इमारती खोलगट, दलदलीच्या भागात उभारल्या जात आहेत. अशा इमारतींच्या पायाची उंची वाढविण्यासाठी मातीची भरणी खोलगट भागात करावी लागते. ही सगळी माती भूमाफिया रात्रीच्या वेळेत उंबार्ली टेकडी येथून वन विभागाच्या जागेतून चोरून आणतात. या माध्यमातून महसूल विभागाचे लाखो रुपयांचे स्वामीत्वधन चुकवले जात आहे, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली असून त्यासंबंधीचे पत्र वनविभाग आणि कल्याणच्या तहसीलदारांना पाठवले आहे. दगड, मुरुम असलेली माती कल्याण, डोंबिवली परिसरात राहिली नाही. टेकडय़ा जमीनदोस्त झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महसूल विभागाला स्वामीत्वधन भरून अशाप्रकारे माती आणायची असेल तर ती भिवंडी, पनवेल भागातून आणावी लागते. त्यासाठी लाखो रुपयांचे स्वामीत्वधन महसूल विभागाकडे भरावे लागते. ते चुकविण्यासाठी विकासक, माफिया रात्री ११ वाजल्यानंतर उंबार्ली टेकडी येथील वन विभागाच्या जागेत जेसीबी, पोकलनेचा वापर करून माती पोखरून काढतात. ही माती तात्काळ रात्रीच्या वेळेत गृह प्रकल्पाच्या ठिकाणी आणून टाकतात. ही माती आणताना पोलीस नाके कोठे असणार नाही अशा प्रकारचे रस्ते शोधून वाहतूक केली जाते, असे निसर्गप्रेमींनी सांगितले. चुकून पोलीस अशा वाहनाला सामोरे आले तर मोठय़ा राजकीय व्यक्तीला संपर्क करून पोलिसांचा अडथळा दूर केला जातो, असे या क्षेत्रातील एका माहितगाराने सांगितले. भरावासाठी उपयुक्त अशी माती उंबार्ली टेकडीत असल्याने कल्याण-डोंबिवली परिसरातील भूमाफिया या ठिकाणी रात्रीच्या वेळेत उत्खनन करून माती चोरून नेत आहेत. आताही हा प्रकार सर्रास सुरू आहे. वनविभागाच्या हद्दीत हा प्रकार सुरू असल्याचे निसर्गप्रेमींनी सांगितले. उंबार्ली परिसरात म्हाडाचे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून १७ इमारतींचे घरांचे प्रकल्प सुरू आहेत. या ठिकाणी म्हाडाचे ठेकेदार म्हणून बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी सरकारी जागेवर आवास योजनेतील घरे बांधत आहेत. या प्रकल्पावर देखरेख करीत असलेल्या अभियंता, कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळेत वनविभागाच्या जागेत होणारा मातीचोरीचा प्रकार दिसत आहे. पण त्यांना अडविण्याचा अधिकार नसल्याने त्यांची कोंडी होत आहे. भूमाफियांनी अशा प्रकारे सतत टेकडी खोदून उत्खनन केले तर टेकडीला मोठी घळी तयार होईल आणि पावसाळ्यात त्या घळीतून पाणी म्हाडातर्फे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या दिशेने येऊन पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होईल, अशी भीती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वनविभागाची गस्त म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर महसूल अधिकाऱ्यांनी स्वामीत्वधन चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. वन विभागाचे अधिकारीही या ठिकाणी सध्या दिवसरात्र गस्त ठेवून मातीचोरांवर कारवाई करीत आहेत. कल्याणच्या वन अधिकाऱ्यांशी, तहसीलदारांशी संपर्क होऊ शकला नाही.