आवक घटल्याने दरांत किलोमागे ३० रुपयांपर्यंत वाढ पूर्वा साडविलकर, लोकसत्ता ठाणे : नोव्हेंबरपासून सातत्याने चढणीला असलेले भाज्यांचे दर कमी होत असतानाच, कडधान्ये आणि डाळींच्या दरवाढीने सर्वसामान्यांचा खिसा कापण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुक्काम ठोकून राहिलेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने धान्ये, कडधान्ये आणि डाळींची आवक सातत्याने घटत आहे. त्यातच या जिन्नसांचा शेतकरी, व्यापाऱ्यांकडील साठाही कमी होत चालल्याने डाळी व कडधान्यांच्या दरांत किलोमागे दोन ते तीस रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांसह धान्य, कडधान्य आणि डाळींच्या पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आणि किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली होती. डिसेंबर महिन्यात काही प्रमाणात भाज्यांचे उत्पादन उत्तम झाल्यामुळे बाजारात भाज्यांची आवक वाढली आणि किमतीत घट झाली. मात्र धान्य, कडधान्ये आणि डाळींची आवक अद्यापही मागणीच्या तुलनेत कमी आहे. तसेच व्यापाऱ्यांकडील साठाही संपत चालला आहे. साठवणुकीतील कडधान्य तसेच डाळी विक्रीसाठी उपलब्ध असल्याने डिसेंबर महिन्यात भाव कमी झाले होते. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून दरात वाढ झाली असून साठा कमी असल्यामुळे हा प्रकार होत आहे, असा दावा वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य विभागाचे अधिकारी विजय शिंगाडे यांनी केला. धान्यांमध्ये बाजरी, ज्वारी तर कडधान्यामध्ये मसुर, वाल, वाटाणा आणि डाळीमध्ये मूग डाळ, उडीद डाळ, मसुर डाळ हे किरकोळ बाजारात २ ते ३० रुपयांनी महाग झाले आहेत. डाळींच्या उत्पादनासाठी मार्च एप्रिल हा अनुकूल कालावधी असतो. सद्य:स्थितीत मूग डाळ, उडीद डाळ, मसुर डाळ यांचा साठा संपत आल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. ज्वारी, बाजरी का महागली? ज्वारीच्या उत्पादनासाठी ऑगस्ट ते फेब्रुवारी हा कालावधी अनुकूल मानला जातो. मात्र, २०१८ मध्ये परतीचा पाऊस कमी झाल्याने ज्वारीच्या पिकाची लागवड कमी प्रमाणात झाली. त्यामुळे उत्पादन घटले. सद्य:स्थितीला, बाजारातील ज्वारीचा साठा संपत आल्यामुळे ज्वारीच्या किमतीत वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी परतीचा पाऊस उत्तम प्रकारे झाल्यामुळे फेब्रुवारीनंतर बाजारात ज्वारीची आवक मोठय़ा प्रमाणात होईल, असे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हिवाळ्यात बाजरीला मागणी असते. बाजरीची पेरणी जून महिन्यात करण्यात येते. ऑक्टोबर महिन्यात हे पीक पूर्ण तयार होते आणि काढले जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजरीची आवक घटली आणि त्यांच्या दरात वाढ झाली आहे. धान्य, कडधान्ये, डाळींचे किरकोळ बाजारातील दर धान्य १ जानेवारी २१ जानेवारी बाजरी ३६ ३८ ज्वारी ४८ ५२ मसूर ७५ ८० वाल १३५ १४० वाटाणा (पां) ९८ १२० वाटाणा (हि) ११० १४० मूग डाळ १०८ ११६ उडीद डाळ १२० १३० मसूर डाळ ७२ ८० (दर रुपये प्रतिकिलो)