आमदार केळकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ठाणे महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, या इरेने पेटलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये अन्य पक्षांतील आजीमाजी नगरसेवकांना पक्षात आणण्याची स्पर्धाच लागली आहे. अशाच स्पर्धेतून बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी नगरसेवकांसह शिवसेना व राष्ट्रवादीतील काही ‘कलंकित’ पदाधिकाऱ्यांसोबत भाजपच्या नेत्यांनी बोलणी सुरू केली आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पक्षातील जुन्या गटाने आता आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केल्याचे समजते. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमध्ये शिवसेनेच्या तुलनेत भाजपची अवस्था फारच तोळामासा आहे. विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर यांनी शिवसेनेला धूळ चारली खरी, मात्र हा विजय महापालिका निवडणुकीत परावर्तित करण्यात यश मिळेल का याविषयी भाजपच्या गोटात संभ्रम आहे. ठाणे महापालिकेतही एखाददुसरा अपवाद वगळता भाजप नगरसेवकांना स्वतचे अस्तित्व दाखविणेही जमलेले नाही. स्थायी समिती सभापती पद सध्या भाजपच्या ताब्यात असले तरी आर्थिक नाडय़ा शिवसेनेच्या ताब्यात असल्याने या आघाडीवरही शिवसेना नेते ठरवतील तीच पूर्व दिशा अशी भाजपची अवस्था आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत सर्व पक्षांतील नाराजांचा गळाला लावण्याची मोहीम सध्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे. मात्र, अशा ‘भरती’वरून पक्षात दोन गट पडल्याचे चित्र आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातील पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवाराच्या विजयाचे शिल्पकार संजय घाडीगावकर यांना भाजपकडे खेचून आणण्यात आमदार संजय केळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासोबतच इंदिरानगर भागातील विलास कांबळे या बसपच्या नगरसेवकासही केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारी हजर केले. शिवसेनेच्या पाठिंब्यावर चार वर्षांपूर्वी स्थायी समिती सभापतीपद भूषवणाऱ्या कांबळे यांच्या भाजपप्रवेशामुळे सेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मात्र, हे सर्व सुरू असतानाच आता या मुद्दय़ावर भाजपमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. ठाण्याचे महापौर पद भूषविलेला शिवसेनेचा एक नेता भाजपच्या विभाग स्तरावरील नेत्याच्या संपर्कात असल्याची चर्चा असून शिवसेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेले ‘राष्ट्रवादी’ नगरसेवकांसोबतही बोलणी सुरू झाली आहेत. हे करत असताना सूरज परमार आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दोघा नगरसेवकांसोबत पक्षातील काही नेत्यांचे गुप्तगू सुरू झाल्याने ठाण्यातील केळकर गट कमालीचा अस्वस्थ बनला असून या मंडळींना प्रवेश दिल्यास पक्षाचे काही खरे नाही, असा सल्लावजा इशाराच या गटाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीत दिला. कोण, किती आणतो, याची स्पर्धा शिवसेनेचा एक बडा पदाधिकारी गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून हे गणित जमले नाही तर निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षांतील नगरसेवकांना पक्षात आणण्याची जोरदार तयारी भाजपकडून सुरू आहे. कोण किती नगरसेवक पक्षात आणतो ही स्पर्धाच जणू पक्षातील विविध गटांमधून सुरू असून त्यामुळे काही वादग्रस्त नगरसेवकांनाही पक्षात प्रवेश दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परमार प्रकरणातील दोषी नगरसेवकांना पक्षप्रवेश देण्यासंबंधी चर्चा सुरू आहे का याविषयी मला कल्पना नाही. मात्र, पक्षात प्रवेश देण्यापूर्वी संबंधित पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पाश्र्वभूमीचा विचार करायला हवा, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली आहे हे वृत्त खरे आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विजयात उमेदवाराच्या चारित्र्याचा मतदारांनी प्राधान्याने विचार केला होता हे दुर्लक्षून चालणार नाही. - संजय केळकर, आमदार