आशीष धनगर

दिव्यात ‘एल्फिन्स्टन’ची पुनरावृत्ती होण्याची भीती; रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजनेसाठी हालचाली

सोसाटय़ाच्या वाऱ्यासह सोमवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसात दिवा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होता होता टळली. सदैव गजबजलेल्या या पुलावर पावसापासून वाचण्यासाठी अनेक प्रवासी थांबले असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने येथे प्रचंड गोंधळ उडाला. परंतु, स्थानकातील सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत गर्दीचे नियोजन केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दिवा स्थानकात घडलेल्या या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अशा संवेदनशील स्थानकांची यादी तयार करून आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचना स्थानिक व्यवस्थापनाला करण्यात आल्याचे समजते.

दिवा स्थानकात सीएसएमटीच्या दिशेने असलेला पादचारी पूल प्रवाशांनी सदैव गजबजलेला असतो. त्यामुळे अनेक प्रवासी पुलाऐवजी रेल्वे रूळ ओलांडून मार्गक्रमण करतात. परंतु, सोमवारी रात्री अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे या पादचारी पुलाकडे प्रवाशांनी धाव घेतली. त्यामुळे पुलावर मोठी गर्दी उसळली. पावसापासून स्वत:ला बचावण्यासाठी जो तो पुलावर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. त्यातच स्थानकातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पुलावर काळोख पसरला. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात भर पडली. पादचारी पुलाच्या मध्यभागी सापडलेल्या प्रवाशांनी आरडोओरड सुरू केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. या वेळी स्थानकात तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाउले उचलत गर्दी बाजूला केल्याने अनर्थ टळला खरा, मात्र या प्रकारामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. यात २३ प्रवाशांना आपला नाहक जीव गमवावा लागला होता. त्यामुळे मध्य रेल्वे स्थानकात धोकादायक ठरलेल्या पादचारी पुलांचाही प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेवरील धोकादायक पादचारी पुल पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक रेल्वे स्थानकांत पादचारी पुलावर पुन्हा एकदा चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली आहे. सुरक्षा दलाकडून काही गर्दीच्या बाबतीत संवेदनशील असणाऱ्या रेल्वे स्थानकांची यादी काढण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ही यादी जाहीर करून या स्थानकांतील रेल्वे पूलांवर रेल्वे सुरक्षा दलाचे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना मेगाफोन दिले जाणार असून त्याद्वारे गर्दी कमी करण्याची उद्घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे पुलावरील होणारी कोंडी टाळता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मध्य रेल्वेवरील गर्दीच्या बाबतीत संवेदनशील असणाऱ्या स्थानकांची यादी दोन दिवसांत मागवण्यात येणार आहे. त्या स्थानकांच्या पादचारी पुलावर अधिकच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच पादचारी पुलावर गर्दी झाल्यास प्रवाशांनी कोणत्याही प्रकारचा अफवेवर विश्वास ठेवू नये. अशा वेळी आरडाओरडा करणे टाळावे

– के. के.अश्रफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे