उल्हास नदीत जीवनदीपच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान जल जागृती निमित्ताने गोवेली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी उल्हास नदीपात्राची स्वच्छता केली. उल्हास नदीच्या पात्रात वाढलेल्या जलपर्णी वनस्पतींमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत होता. गोवेली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जलजागृती सप्ताहाचे औचित्य साधत पाण्यातील जलपर्णी वनस्पती हटविल्या. उल्हास नदीतील प्रदूषणाविषयीच्या अनेक बातम्या यापूर्वी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. प्रदूषणामुळे नदीपात्रात जल वनस्पती व शेवाळाची मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या वनस्पतीमुळे पाण्यात मिसळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. पाण्याला दरुगधी निर्माण होते. या दरुगधीमुळे पाण्यातील माशांना धोका निर्माण होत आहे. तसेच पुलावरून वाहतूक करणारे प्रवासी घरातील देवाला वाहिलेली फुले, नारळ व इतर साहित्य प्लास्टिकच्या पिशव्यांसहित नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नदीमध्ये मोठय़ा प्रमाणात घन कचरा साचून राहून नदी प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. उल्हास नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी गोवेली महाविद्यालयाच्या प्रा. भाग्यश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २७ विद्यार्थ्यांनी नदीचे पात्र सफाई मोहीम राबविली. नदीपात्र मोठे असल्याने पूर्णपणे स्वच्छ करणे कठीण असले, तरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात जलपर्णी हटवून जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने विधायक कार्य केले आहे.