रेल्वे मंत्रालयाकडून ४५ लाख रुपये मंजूर गेल्या अनेक वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडून मागणी होत असलेल्या डहाणू-नाशिक रेल्वे सर्वेक्षणाला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागाचा झपाटय़ाने विकास होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्याचा विकास साधण्यासाठी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री राम नाईक व खासदार चिंतामण वनगा यांच्या प्रयत्नाने डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र डोंगरदऱ्यांतून जाणारा हा मार्ग किफायतशीर ठरणार नाही असा अहवाल दिल्यानंतर हे प्रकरण बारगळले. ऑगस्ट २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर या भागातील कुपोषण व बालमृत्यूच्या प्रकाराने डोके वर काढले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व्हावी तसेच रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखावे याकरिता औद्योगिकीकरण करण्याचा प्रस्ताव आला. डोंगराळ भागात रस्त्याच्या मार्गाने मालवाहतूक करणे कठीण होईल हे लक्षात घेऊन डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाची मागणी तत्कालीन खासदार अॅड्. चिंतामण वनगा यांनी विविध पातळीवर लावून धरली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हा प्रश्न मागे पडेल अशी भीती या भागातील नागरिकांना वाटत होती. मात्र पोटनिवडणुकीत विजयी झालेले खासदार राजेंद्र गावित यांनी मुंबईच्या दौऱ्यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल आले असता हा विषय त्यांच्यासमोर मांडला. या प्रस्तावाला रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी देऊन ४५ लाख रुपये मंजूर केल्याचे खासदार गावित यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पुढील अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केल्यानंतर सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला आरंभ होईल.