मलनिस्सारण वाहिनीतील गळतीमुळे मासे मृत्युमुखी शहराला पाणीपुरवठा करणारे स्रोत अपुरे असल्याने कायम टंचाईची टांगती तलवार असूनही पारंपरिक जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत उदासीनता आहे. चेंदणी येथील अभिनय जोशी यांच्या वाडय़ातील एका खासगी विहिरीचे पाणी मलनिस्सारण वाहिनी तुंबल्याने दूषित झाले आहे. दूषित पाणी विहिरीत मिसळल्याने त्यातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अमेरिकन वॉच कंपनीसमोर जोशी वाडय़ात स्वच्छ गोडय़ा पाण्याची विहीर आहे. ही विहीर अभिनय जोशी यांच्या मालकीची असल्याने गेली अनेक वर्षे ते विहीर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या विहिरीत असणारे गप्पी मासे, गुरामी मासे पाहण्यासाठी मत्स्यप्रेमी हौसेने गर्दी करीत असतात. डासांची पैदास नियंत्रणात आणण्यासाठी गप्पी माशांचा उपयोग होत असतो. हे गप्पी मासे गटारात सोडण्यासाठी महापालिकेचे पथक अनेकदा या विहिरीतील मासे घेऊन जात असते. पाणीटंचाई असल्यावर परिसरातील नागरिकांना या विहिरीतील पाण्याचा आधार असतो. मात्र काही दिवसांपूर्वी स्थानक परिसरातील रस्त्यावरील मलनिस्सारण वाहिनीतील दूषित पाणी या विहिरीत येऊन मिसळल्याने ही विहीर पूर्णत: अस्वच्छ झाली आहे. स्थानक परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या वेळी ठाणे महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आली. मात्र तेव्हापासून दर सहा महिन्यांनी मलनिस्सारण वाहिनी तुंबते. ते दूषित पाणी जिरून विहिरीत पोहोचते. मलनिस्सारण वाहिनीचे दूषित पाणी विहिरीत मिसळल्याने या विहिरीतील हजारो मासे मृत पावल्याची माहिती अभिनय जोशी यांनी दिली.