भाषा ही भाषा असते. ती कधीही अशुद्ध नसते. अलीकडे मुलांनी शाळेत प्रमाण भाषा, बोलीभाषेचा वापर केला तर मातृभाषेचा काडीचाही गंध नसलेली शिक्षक मंडळी त्या मुलांना शुद्ध बोल म्हणून गप्प करतात. यामधून विद्यार्थ्यांमध्ये बोलायचे कोणत्या भाषेत, असा न्यूनगंड तयार होतो. भाषाशुद्धीच्या नावाने एक उमदी पिढी बिघडविण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे, अशी खंत संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक प्रा. राजन गवस यांनी डोंबिवलीत रविवारी ४५ व्या महानगर मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केली. मुंबई मराठी साहित्य संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखा यांच्यातर्फे डोंबिवलीत महानगर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्या वेळी प्रा. गवस बोलत होते. ज्येष्ठ कवयित्री प्रा. नीरजा, प्रा. उषा तांबे, आमदार रवींद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष माधव जोशी, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, वामन देशपांडे, सुरेश देशपांडे, प्रा. धनश्री साने, उज्ज्वला मेहेंदळे उपस्थित होते. ‘राजकीय इच्छाशक्तीचा अभाव’ : बहुतांशी विद्यापीठांचे कुलगुरू विज्ञान शाखेचे पदवीधर असतात, त्यांना मराठीविषयी कणव वाटत नाही. मराठीविषयी कणव असलेला नेता यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर झाला नाही. चव्हाण यांच्या काळात अनेक साहित्यिक संस्था आकाराला आल्या. आता अशी राजकीय इच्छाशक्ती कोठे दिसत नाही. मराठी भाषेसाठी वेगळे विद्यापीठ करायला विरोध केला जात आहे. अशा पद्धतीने आपणच मराठीचा गळा घोटत आहोत, असे प्रा. गवस यांनी सांगितले.