उष्ण, दमट वातावरणामुळे नागरिक हैराण ठाणे : जिल्ह्यात गेल्या आठवडय़ाभरापासून पावसाने दडी मारली असल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. उष्ण आणि दमट वातावरणामुळे उकाडा वाढला असून नागरिकांचे हाल होत आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे अनेक नागरिकांना सर्दी, खोकला आणि ताप या आजारांची लागण झाली असून या काळात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाल्याचे दिसत असून आठवडय़ाभरात ४ ते ५ अंश सेल्सियसने तापमान वाढले आहे. ठाणे जिल्ह्यात मागील आठवडय़ात ३० अंश सेल्सियसपर्यंत तापमान होते. मात्र, या आठवडय़ात जिल्ह्याचा पारा वाढला असून तापमान ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरण तसेच उन्हाची वाढलेली तीव्रता यांमुळे जिल्ह्यात सध्या दमट आणि उष्ण वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उकाडा जाणवू लागला असून नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. या वातावरणामुळे जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण वाढले असून सर्दी, खोकला आणि ताप हे आजार जास्त प्रमाणात होत आहेत. तसेच सध्या मलेरिया, डेंग्यू यांच्या रुग्णामध्येही वाढ होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिली. जिल्ह्यातील तापमान शहर तापमान ठाणे ३१ डोंबिवली ३४ कल्याण ३५ भिवंडी ३३ शहापूर ३४ उल्हासनगर ३२ अंबरनाथ ३३ बदलापूर ३२ (अंश सेल्सिअसमध्ये)