मुख्यमंत्र्यांचे मर्जीतले संजीव जयस्वाल पक्षाच्या नगरसेवकांना नकोसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी अशी ओळख असलेले ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. आयुक्त मनमानी करत असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची सूचना मांडली आहे. भाजप नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या तहकूब सूचनेविरोधात काळ्या फिती लावून काम करायचे ठरविले आहे. विशेष म्हणजे, जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी थेट राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांची भेट घेतली. ठाणे पोलिसांच्या बीट मार्शलसाठी बुलेट खरेदी करण्याचा प्रस्ताव गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावला होता. असे असतानाही हा प्रस्ताव तहकूब असल्याचे सांगत प्रशासनाने मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे तो पुन्हा मंजुरीसाठी सादर केला आहे. या मुद्दय़ावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाला खिंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वंदना सोसायटी, कोठारी कंपाउंड तसेच अन्य प्रस्तावांच्या मुद्दय़ांवरून भाजपचे नगरसेवक आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. या पत्रामुळे भाजप आणि प्रशासनातील संघर्षांला पूर्णविराम मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची सूचना मांडल्याने ती फोल ठरली आहे. भाजपचा आरोप.. इतिवृत्तांत बदल करणे, अत्यंत महागडे पाणी सत्ताधारी पक्षाच्या गळ्यात मारणे आणि ठाणेकर जनतेवर बोजा लादणे असे विषय मनमानी पद्घतीने सुरू असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात केला आहे. जे घरी जाऊन भेटतात त्यांचीच कामे करायचे तसेच इतरांना अपमानित आणि भेदभाव करून ठरावीक नगरसेवकांची अडवणूक केली जाते, असा आरोपही त्यांनी आयुक्तांवर केला आहे. प्रशासनाच्या ‘हम करे सो कायदा’ या मनमानी कारभाराविरोधात सभा तहकूब करण्याची सूचनाही त्यांनी मांडली आहे. पालिका अधिकारी अस्वस्थ.. ठाणे महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर संजीव जयस्वाल यांनी गेल्या तीन वर्षांत विविध मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे शहराच्या विकासासाठी चांगली कामे करत असतानाही दुसरीकडे अशा प्रकारची टीका आणि आरोप होत असेल तर कामे कशी करायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यातूनच अस्वस्थ झालेल्या अधिकाऱ्यांनी सभागृहात काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.