जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यासोपयोगी महोत्सवासाठी जय्यत तयारी
जोशी बेडेकर महाविद्यालयाचे नवरंग, गंधर्व महोत्सव पार पडल्यावर व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांना वेध लागतात ते क्रिसिलिस महोत्सवाचे.. मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात पाहायला मिळते. मात्र व्यवस्थापन विभागाचा क्रिसिलिस महोत्सव इतर महाविद्यालयीन महोत्सवांपेक्षा वेगळा ठरतो. संपूर्ण महोत्सवाला अभ्यासाचे स्वरूप असल्याने विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्र या महोत्सवात आयोजित केली जातात. यंदाचा व्यवस्थापन विभागाचा क्रिसिलिस महोत्सव २९ आणि ३० जानेवारी रोजी होणार असून विद्यार्थी महोत्सवाची तयारी करताना दिसत आहेत.
दरवर्षी नवनवीन संकल्पनांवर आधारित क्रिसिलिस महोत्सव खास व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जातो. संपूर्णपणे अभ्यासाचे स्वरूप असलेल्या महोत्सवामध्ये अनुभवी व्यक्तींचे व्याख्यान, चर्चासत्रे यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी दिशा मिळते. यंदाच्या वर्षी ‘एमबार्क डिजिटल इटरनिटी द वे फॉरवर्ड’ या संकल्पनेवर विद्यार्थी डिजिटलायजेशन आणि स्टार्टअप या विषयांवर महोत्सवाचे आयोजन करत आहेत.१५ ते २० जणांचा मुख्य समूह महोत्सवासाठी कार्यरत असून दीक्षा राणे, प्रियांका जोशी आणि प्रियांका भट्टा महोत्सवाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
महोत्सवात अभ्यासोपयोगी विविध कार्यक्रमांची रेलचेल असून मार्केटिंग मेनिआ, फायनान्शिअल गुरू, छायाचित्र, माध्यम व्यवस्थापन, लघुपट अशा प्रकारचे उपक्रम या महोत्सवाच्या अंतर्गत होणार आहेत. मार्केटिंग मेनिआ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना एखाद्या उत्पादनाविषयीचा अभ्यास करण्यास देणार आहेत. तसेच फायनान्शिअल गुरू या स्पर्धेत विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्पादनाची शुल्क आखणी करायची आहे. या उत्पादनाची विक्री झाल्यास त्यासाठी विमा धोरण लागू करायचे आहे, अशा प्रकारचे प्रात्यक्षिक ज्ञान देणारे उपक्रम महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत आहेत. दरवर्षी नावीन्य असणाऱ्या संकल्पनेवर आधारित क्रिसिलिस महोत्सवात मनोरंजन आणि अभ्यास यांची सांगड असलेली पाहायला मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्रिसिलिस महोत्सवाचे आकर्षण असते.
– प्रियांका जोशी, जोशी बेडेकर महाविद्यालय

एसआयसीईएस महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती
अथर्व प्रभुणे, युवा वार्ताहर
अंबरनाथच्या एस.आय.सी.ई.एस. महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून दिली. या कार्यक्रमात माजी विद्यार्थिनी पूनम बरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेताना सावित्रीबाईंच्या शिक्षण क्षेत्रातील आणि इतर योगदानाबद्दल माहिती दिली. महाविद्यालयाचा विद्यार्थी मार्शल नादर आणि काही विद्यार्थ्यांनी मिळून सावरेवाडी गावाला दत्तक घेतले आहे. त्या विभागातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येते आणि त्यांना गरजोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते. आज युवा पिढी काही प्रमाणात चुकीच्या मार्गाकडे वळत आहे. जर देशाची प्रगती हवी असेल तर युवा पिढीने पुढाकार घेऊन अशा सामाजिक कार्याना हातभार लावावा, असे आवाहन मार्शल यांनी केले. प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षल बच्छाव यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा कार्यकाल स्पष्ट केला. सामाजिक चळवळीत खडतर परिस्थितीशी सामना करणाऱ्या महात्मा फुले यांच्या जीवनावरील पुस्तक सावित्रीबाईंनी प्रदर्शित केले. तसेच त्यांचा ‘काव्यफुले’ हा शिक्षणाचा महत्त्व सांगणारा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला, असे मनोगत प्राचार्यानी व्यक्त केले.

अवकाशीय कल्पनाशक्तीचा अभ्यास
प्रतिनिधी ठाणे</strong>
चांदीबाई हिंमतमल मनुसुखानी महाविद्यालयात अवकाशीय कल्पनाशक्ती या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्पेशिअल इमॅजिनेशन- अ‍ॅन इंटरडिसिप्लिनरी अ‍ॅपरोच टू लिटरेचर, कल्चरल हिस्टरी अ‍ॅण्ड जिओग्राफी’ या संकल्पनेवर आधारित ८ आणि ९ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषद महाविद्यालयात होणार आहे.
महाविद्यालयातील इंग्रजी आणि भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात
आली आहे. हैद्राबाद, दिल्ली, इंग्लंड, अहमदाबाद येथील संपूर्ण भारतातून ४० संशोधन पत्रिका विविध प्राध्यापक, संशोधक सादर करणार आहेत. परिषदेत मुंबई विद्यापीठाचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. रामभाऊ बडोदे यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार केला जाणार आहे.

पेंढरकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
प्रतिनिधी, डोंबिवली
खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाविद्यालयीन स्पर्धानी भरलेल्या पेंढरकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच महाविद्यालयाच्या पटांगणात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील उपस्थित होते, तर व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई, धनंजय कुडाळकर, प्रा. लिमये, प्रा. अनुराधा रानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वतंत्र विचार करणे ही विकासाची पहिली पायरी आहे. आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान व विद्या नको आहे. शिकूनही तुम्ही स्वतंत्र विचाराचे झाले नाही तर देशाची प्रगती होणार कशी, असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी या कार्यक्रमात मांडले. त्यांचे अनुभवसंपन्न विचार ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनीही मोठी गर्दी केली होती. या वेळी प्रा. अनुराधा रानडे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व शिक्षणेतर कामगिरीचा अहवाल सादर केला. महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील वलय या आंतरविभागीय स्पर्धेची तसेच विनावाहन दिवस, पारंपरिक वेशभूषा दिवस, करिअर फेस्ट, क्रीडारंग यांसारख्या निरनिराळ्या उपक्रमांची सांगता या बक्षीस वितरण सोहळ्याने झाली. ‘स्टुडंट ऑफ द इअर’चे पुरस्कार या समारंभाचे आकर्षण होते. कनिष्ठ महाविद्यालयातील दियंका नारकर, वरिष्ठ महाविद्यालयातील संपदा उकिडवे या विद्यार्थ्यांना ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. दिव्या नायर व मनसा सुरेश यांना ‘रीडर ऑफ द इअर’ हा किताब प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणाल कुलकर्णी यांनी केले.

‘आदर्श व्यक्तिमत्त्वांमुळे विद्यार्थ्यांच्या नेणिवा विस्तारतील’
प्रतिनिधी ठाणे,
आजची आधुनिक पिढी आपले मूळ विसरत चालली आहे. मात्र त्याच्या वैचारिक प्रगल्भतेमध्ये वाढ करण्यासाठी ऐतिहासिक प्रबोधनाची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या आदर्शवत व्यक्तिमत्त्वांचे जीवनपट त्यांच्या समोर ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या जाणिवाही विस्तारतील, असे मत विद्याप्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. माधुरी पेजावर यांनी मांडले. जागर जाणिवांचा अभियान, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सुमारे शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी बंद होती, अशा भारतात महात्मा फुल्यांच्या मदतीने सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला व तत्कालीन समाजाचे शिव्याशाप, निंदा व शेणाचे गोळे सहन करून त्या समाजप्रबोधनावर ठाम राहिल्या. त्या वेळी अडाणी व अंधश्रद्धा गर्तेत बुडालेल्या समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवून बाहेर काढण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. अशा प्रकारे प्रा. मीनल वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांची थोडक्यात ओळख करून दिली. बालविवाह व बालविधवा यांच्याबरोबर सतीची चाल अशा अनिष्ट परंपरा व चालीरीती त्या काळात महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्या होत्या. त्या पाश्र्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांचे समाजकार्य व शिक्षणकार्य फारच महत्त्वाचे ठरते, असेही त्या म्हणाल्या.
दोन तास चाललेल्या या वैचारिक महाजागराची सांगता कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रा. किरण पारिया यांनी आभारप्रदर्शनाने केली. या निमित्ताने ग्रंथालय विभागात याच प्रयोजनार्थ एका आगळ्यावेगळ्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

खर्डी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी
श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून दहीगावाचा विकास
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यलय खर्डी येथील राष्ट्रीय सेवा विभागातर्फे २५ ते ३१ डिसेंबर या कालवधीत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानासोबत सामजिक बांधिलकीची जाणीव होण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागातर्फे शिबिरासाठी एका गावाची निवड करण्यात येते. या शिबिरासाठी महाविद्यालयाने शहापूर तालुक्यातील दहीगावाची निवड केली होती. या शिबिरात महाविद्यालयातील ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी सात दिवस दहीगावात राहून विविध उपक्रम राबवले. प्रत्येक दिवसाची सुरुवात विद्यार्थी योग, प्राथना व श्रमसंस्काराने केली. २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा विभागातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. नेत्र तपासणी करण्यासाठी डॉ. के. बी. गायकवाड उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत दहीगावातील व आजूबाजूच्या आदिवासी भागांतील सुमारे १५० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी या वेळी करण्यात आली. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा विभागाच्या माध्यमातून नागरिकांना १०० रुपये सवलतीमध्ये चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. गावातील नागरिकांमध्ये जनजागृती घडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, व्यसनमुक्ती, बालविवाह, स्त्री सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता या सामाजिक विषयावर पथनाटय़ विद्यार्थ्यांनी सादर केले. याशिवाय विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता, शोष खड्डे तयार करणे व रस्ते दुरुस्ती करणे यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले. तसेच घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले.
या शिबिराला मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक बाबासाहेब बिडवे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि ग्राम स्वच्छतेची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच पुष्कर देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीचे कौशल्य आणि त्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

जी. आर. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल
अभ्यासासोबत गायन, ध्वनिचित्रण, प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव
प्रतिनिधी ठाणे
अभ्यासासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी महाविद्यालयातर्फे अभ्यास सहलींचे आयोजन केले जाते. डोंबिवली येथील जी. आर. पाटील महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातील बी.एस्सी.- बॉटनी, बी.एम.एस, पत्रकारिता, बी.कॉम- अकाऊंटिंग आणि फायनान्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल नेण्यात आली होती.
बी.एम.एस. आणि बी.कॉम. अकाऊंटिंग फायनान्सच्या १५० विद्यार्थ्यांची अभ्यास सहल नवनीत पब्लिकेशन आणि अरिहंत इंडस्ट्रीज वसई येथे आयोजित करण्यात आली होती. पुस्तकांची निर्मिती तसेच कंपनीचे अकाऊंट विभागाचे काम कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. पत्रकारितेच्या ५० विद्यार्थ्यांची अभ्यास सहल मुंबई फिल्मसिटी मालाड आणि गोरेगाव येथे नेण्यात आली होती. या ठिकाणी ध्वनिचित्रण, गायन, थेट प्रक्षेपण या कामाची ओळख झाली. तसेच बी.एस्सी. बॉटनीच्या विद्यार्थ्यांना कर्नाळा बर्ड सेन्चुरी येथील बॉटनिकल गार्डनमध्ये वेगवेगळ्या दुर्मीळ प्रकारच्या वनस्पती आणि औषधी झाडे यांची माहिती प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिली.

–  किन्नरी जाधव