भिवंडी : खेळताना झालेल्या मुलांच्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर आणि तिच्या दोन्ही मुलांच्या अंगावर गरम भात फेकण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी भिवंडीत घडला. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. भिवंडीतील कापतलाव परिसरातील चाळीत राहणाऱ्या मुलांमध्ये खेळताना भांडण झाले. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शबाना शाह व तिच्या दोन्ही मुलांवर रुकसाना अन्सारी या महिलेने गॅसवर शिजत असलेला गरम भात अंगावर फेकला. यामध्ये शबाना, तिचा मुलगा शाहनवाज (६) आणि मुलगी सानिया (७) हे भाजले आहेत. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रुकसानाला अटक केली आहे.

पावणेतीन लाख रुपये असलेली बॅग चोरीला

कल्याण : बँकेत पैसे भरण्यासाठी निघालेल्या श्रीकांत शिंदे यांची मोटारसायकल अडवून दोघा चोरटय़ांनी त्यांच्याकडील पावणेतीन लाखांची रोकड असलेली बॅग खेचून नेल्याची घटना घडली. पश्चिमेकडील बुवाची चाळ येथे राहणारे श्रीकांत शिंदे हे कल्याण येथील बँकेत पैसे भरण्यासाठी जात होते. त्याच वेळी शांतीनगर पोलीस ठाण्याजवळील राजीव गांधी उड्डाणपुलावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरटय़ांनी त्यांना अडवून त्याच्याकडील पैशाची बॅग घेऊन पळ काढला. या बॅगेत दोन लाख ७४ हजार ८९९ रुपयांची रोख रक्कम होती. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावणेदोन लाखांची घरफोडी

अंबरनाथ : येथील मानेरा गावात राहणारे जयवंत जोशी यांच्या घरी गुरुवारी पहाटे घरफोडीची घटना घडली. चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून एक लाख ८२ हजारांचा ऐवज चोरून नेला.अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.