ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील शिरोळ वनपरिक्षेत्रातील अजनुप भाग व परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाने या परिसरात गस्त वाढवली असून वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील अजनुप विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन व वावर होत असल्याची ओरड सुरू झाली. त्यातच मंगळवारी सकाळच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या एका बकरी फार्ममधून दोन बक-यांना बिबट्याने नेल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार शिरोळ विभागाचे वनपाल विजय गायकवाड व सहकारी व वनरक्षक यांनी या भागात पाहणी केली असता बिबटयाच्या पायाचे ठसे व बिबट्याचा वावर असल्याचे तर बिबट्याचे शौच व बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याचे सांगितले. हा बिबट्या जंगलात व शेतावर नदीकाठी वावरत असल्याने परिसरातील लोकांनी या भागात जाऊ नये. तसेच सध्या भात झोडणी शेतातील खळ्यावर केली जात असल्याने लहान मुलांना घेऊन जाऊ नये. तसेच एकटे नदीकाठी व जंगलात तसेच शेतावर जाऊ नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. तर रात्रीची गस्त वन विभागाने वाढविली आहे. मात्र बकऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत व बिबटयाने खाल्याबाबत वनाधिकारी विजय गायकवाड यांनी माहिती देतांना दुजोरा दिला नाही. मात्र ज्या फार्म मधून बिबट्याने बकऱ्या खाल्ल्याचा दावा करण्यात आला आहे त्या फार्म मालकाने उर्वरित सुमारे ४० बकऱ्या खर्डी येथे स्थलांतरित केल्याचे सांगण्यात आले.