मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे स्थानकांची दुराव्यस्था गहण समस्या आहे. त्यात फलाटांवर असणारी दरुगधी, शौचालयांची दैना, कचरापेटय़ांचा अभाव, गर्दुल्यांचा वावर यासोबतच प्रवाशांची अनास्था पण मुख्य समस्या  आहे.त्याविषयींच्या वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया..

स्वच्छता अभियान केवळ प्रसिद्धीसाठी

२१व्या शतकातही भारतीयांना स्वच्छतेचे महत्त्व पुरेसे पटलेले नाही. मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानकांतील शौचालये, पाणपोई, कचरापेटय़ा अपुऱ्याच आहेत. त्यात या सर्व गोष्टींची निगा राखली न गेल्याने अनेक स्थानकांची रया गेली आहे.

सुयश परब, ठाणे

फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांना मज्जाव

शहाड येथील  फलाटाच्या सुरुवातीला फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसते. फळे व इतर पदार्थाचा टाकाऊ  भाग तसाच फलाटावर पडलेला असतो. इतकेच नव्हे; तर फलाटावरील शौचालय गेले कित्येक दिवस बंद आहे. फलाटाची दोन्ही टोके पान, गुटखा, तंबाखूने रंगलेली दिसतात. फलाटावर भिकारी व गर्दुल्ले असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करवा लागतो. –

प्रियांका निंबाळकर, शहाड

कलेचाही अपमान..

रेल्वे स्टेशन खराब करण्याची ही पहिलीच वेळ नाही.  ज्या चमूने रेल्वेच्या भिंतीवर रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले आहे, त्यांची मेहनत वाया घालवत आहोत. शिवाय चित्रकलेसारख्या सुंदर कलेचाही अपमान करतो याचे भान गरजेचे आहे.

प्रसाद प्रधान, ठाणे

सामाजिक भान राखणे गरजेचे..

रेल्वे फलाट किंवा रेल्वे गाडय़ा आपल्या मालकीच्या नाहीत इतकेच ध्यानात घ्यावे. मुळातच भिंत दिसली म्हणून थुंकणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे.

चित्रा म्हस्के, ठाणे