मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील बदल ४ ऑगस्टपर्यंत

ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने ४ ऑगस्टपर्यंत येथील वाहतूक बदल कायम ठेवण्याचा निर्णय शनिवारी ठाणे वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यानुसार मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक कोपरखैरणे, ऐरोली, कोपरीमार्गे वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांचा भार या मार्गावर आल्याने ठाणेकरांना आणखी चार दिवस वाहतूक कोंडीत अडकावे लागण्याची चिन्हे आहेत.

उरण येथील ‘जेएनपीटी’हून भिवंडी, गुजरातकडे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बाह्यवळण मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरुवारी या मार्गावरील ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर मोठा खड्डा पडला. तो बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने गुरुवारपासून या मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना ३१ जुलैपर्यंत बंदी होती. त्यामुळे भिवंडी, गुजरातकडे जाणारी  वाहतूक महापेमार्गे, कोपरखैरणे, रबाळे, ऐरोली, आनंदनगर, कोपरीमार्गे वळविण्यात आली आहे. त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर होत आहे.

ठाण्यात दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून दुपारी आणि रात्री तीन हात नाका ते कोपरी भागात वाहतूक कोंडी होत आहे. तर छोटे ट्रक, टेम्पो  पटणी येथून कळवामार्गे येत असल्याने या मार्गावरही विटावा ते कळवा नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

कारण काय?

सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम अद्यापही पूर्ण न केल्याने वाहतूक बदल ४ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे आणखी चार दिवस ठाणे आणि नवी मुंबईत वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे.

बदल असा…  मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून ठाण्याच्या दिशेने

येणाऱ्या अवजड वाहनांना शीळफाटा येथे प्रवेशबंदी करण्यात आली. येथील वाहने महापे मार्गे कोपरखैरणे पुलाखालून रबाळे, ऐरोली, आनंदनगर चेकनाका, कोपरी रेल्वे पूल येथून ठाण्यात प्रवेश करतील. तर, हलक्या वाहनांना मुंब्रा बाह््यळणमार्गे मुभा देण्यात आली आहे.