ठाणे पोलिसांची साडेसात लाख चालकांवर ई-चलन कारवाई; आणखी १५ कोटी ६५ लाखांच्या दंडवसुलीसाठी मोहीम

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने गेल्या वर्षभरात सात लाख ३६ हजार वाहनचालकांना ई-चलन पाठवले आहेत. त्यातून जवळपास आठ कोटी ७८ लाख २६ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली असून उर्वरित १५ कोटी ६५ लाख रुपयांच्या दंडवसुलीसाठी पोलिसांनी आता मोहीम हाती घेतली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ई-चलन असलेल्या वाहनचालकांना दंड भरण्यासाठी पोलिसांकडून घरपोच नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

‘एक राज्य एक चलन’ अशी योजना राज्य सरकारने लागू केली असून त्यानुसार ही योजना गेल्या वर्षीपासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना ऑनलाइन दंडपावत्या पाठवण्यात येत आहेत. या योजनेच्या कारवाईमुळे १४ फेब्रुवारी २०१९ ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत ७ लाख ३६ हजार ४१ वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले असून या चालकांवर ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली आहे. ७ लाख ३६ हजार ४१ पैकी ३ लाख २४ हजार ५५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ८ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या चालकांकडून एकूण १५ कोटी ६५ लाख १२ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असून त्यासाठी पाच हजारपेक्षा जास्त दंड झालेल्या चालकांना घरपोच नोटिसा पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महिना   कारवाई  दंडवसुली       शिल्लक दंड

२०१९

फेब्रुवारी  १३,०४३ ३०.५६ लाख     ४.५८ लाख

मार्च       ५४,६३० १.१५ कोटी        २९.९९ लाख

एप्रिल      ७३,१०० १.१९ कोटी      १.०९ लाख

मे           ६८,२४५ ९९.७२ लाख        १.२३ कोटी

जून         ६४,६२५ ७९.९५ लाख     १.२१ कोटी

जुलै         ६३,१३५ ७६.१३ लाख     १.५२ कोटी

ऑगस्ट    ६६,७२९ ८१.४२ लाख    १.२३ कोटी

सप्टेंबर    ५२,८३६ ६०.२७ लाख    १.१४ कोटी

नोव्हेंबर   ६१,८५६ ५०.२५ लाख    १.५५ कोटी

डिसेंबर    ६३,८४९ ५५.६१ लाख    १.७७ कोटी

२०२०

जानेवारी  ७६,०१६ ४७.३२ लाख    २.३५ कोटी

फेब्रुवारी   २९,४५९ ११.९७ लाख    १.०१ कोटी

(दंडाची रक्कम रुपयांत)