ठाण्यातील ‘राजर्षी शाहू महाराज’ शाळेची दुरवस्था; वर्गखोल्यांना गळती, वीज-पाण्याची कमतरता वर्गखोल्यांच्या छतांतून गळणारे पाणी, विजेअभावी खोल्यांत दाटलेला अंधार, कच्च्या बांधकामामुळे कधीही कोसळण्याच्या बेतात असलेली इमारत.. एखाद्या ग्रामीण भागातील शाळेत असे चित्र दिसल्यास कदाचित नवल वाटणार नाही. परंतु, ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राजर्षी शाहू महाराज विद्यालयाची ही परिस्थिती आहे. गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या या शाळेच्या संस्थाचालकांना विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधाही पुरवता आलेल्या नाहीत. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या दीड हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. ठाणे शहरातील ज्ञानेश्वर भागात सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज विद्यालय चालवण्यात येते. नितीन कंपनी चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या शाळेच्या पूर्व प्राथमिक ते माध्यमिक विभागाच्या इयत्तांमध्ये एकूण दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या विद्यार्थ्यांच्या जिवाशी आणि भवितव्याशी शाळेकडून खेळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याच्या उद्देशाने १९८५ साली ज्ञानेश्वरनगर परिसरात सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज विद्यालय सुरू करण्यात आले. ३० वर्षे उलटल्यानंतरही या शाळेत मूलभूत सोयीसुविधांची कमतरता भासते. मराठी माध्यमाची शाळा अनेक वर्षे सुरू असली तरी इमारतीची कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही. या उलट शाळेसमोरच नवी इमारत उभारून एका खासगी रुग्णालयाला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. नव्या इमारतीच्या तळ मजल्यावर लहान शिशू ते चौथी इयत्तेपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक शाळेच्या आवारात शिरत असल्याने विजेचे बल्ब, पंखे चोरले जातात, असे संस्थाचालिका कस्तुरी सकट यांचे म्हणणे आहे. या कारणामुळे चार ते पाच वर्षे विद्यार्थ्यांसाठी वर्गात वीज, पंखे बसविण्यात आलेले नाही. शाळेत विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सुविधा नाही. स्वच्छतागृहाची सोयही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो शासनाच्या तुटपुंज्या अनुदानात शाळेत सोयीसुविधा पुरवता येत नाहीत, असे संस्थाचालकांकडून सांगितले जात आहे. मात्र, गेली ३० वर्षे शाळा सुरू असूनही आणि नवी इमारत उभारूनदेखील विद्यार्थ्यांना जुनाट व धोकादायक इमारतीत शिक्षण घ्यावे लागत असल्याबद्दल पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. संरक्षक भिंतीचा अभाव रस्त्याला लागूनच असलेल्या या शाळेला संरक्षक भिंत उभारण्यात आली नसल्याने रात्री मद्यपींनी शाळेच्या आवाराला आपला अड्डा बनवला आहे. मद्यपींकडून टाकल्या जाणाऱ्या दारूच्या बाटल्यांचे तुकडे सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गात पडलेले असतात. इमारतीचे बांधकाम कच्चे असल्याने पाऊस सुरू असताना वर्गात छतावरून पाणी गळत असते. शाळेच्या कोणत्याही वर्गाला दारे, खिडक्या नाहीत. गेली अनेक वर्षे शाळेची जागा एमआयडीसीच्या हद्दीत येत असल्याने दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाला परवानगी दिली गेली नव्हती. शासनाचे अनुदान असले तरी वीज, पाणी, पंखे, कर हा खर्च संस्थेला करावा लागतो. विद्यार्थ्यांची वर्गणी या खर्चासाठी अपुरी पडते. काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीने जागा संस्थेच्या स्वाधीन केल्याने पावसाळ्यानंतर नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू करण्यात येईल. - सागर सकट, संस्थाचालक, राजर्षी शाहू महाराज विद्यालय