महापालिकेकडून आर्थिक मंजुरी; महिनाभरात काम पूर्ण

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची चिरंतन आठवण राहावी आणि त्यांचा आदर्श तरुण पिढीसमोर राहावा, या उद्देशातून ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटय़गृहाच्या आवारात स्वा. सावरकर स्मृतिस्तंभ उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावास आर्थिक मंजुरी मिळाल्याने त्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून या स्मृतिस्तंभाचे काम येत्या महिन्यात पूर्ण केले जाणार आहे.

ठाणे शहराच्या मासुंदा तलावाच्या काठावर असलेल्या गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वाराजवळील आणि तिकीट खिडकीला लागून असलेल्या धबधब्याजवळ स्मृतिस्तंभ उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या स्मृतिस्तंभावर सावरकरांचे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला..’ या काव्यपंक्ती चित्रबद्ध करण्यात येणार आहेत. अंदमानच्या कारागृहातील स्वतंत्र भारताचे कृतिशील स्वप्न पाहणारे सावरकर, तेथील कारागृहातील त्यांची अवस्था, मनातील चलबिचल आणि त्यातून निर्माण झालेले काव्य हे दृश्यस्वरूपात स्मृतिस्तंभाद्वारे मांडण्यात येणार आहे.

या स्मृतिस्तंभावर सावरकरांचे संकल्पचित्र साकारण्यात येणार आहे. अंदमानच्या कोठडीचे चित्र, पाण्यात निखळून पडलेली खिडकीची चौकट, कोलमडून पडलेला ब्रिटिश सत्तेचा पिंजरा आणि त्यातून बाहेर पडणारे स्वातंत्र्यप्रेमी पक्षी म्हणजेच स्वातंत्र्यासाठी तळमळणारे भारतीयच अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी साकारण्यात येणार आहे. सावरकर हे थोर नाटककार होते. त्यामुळेच गडकरी रंगायतनच्या आवारात त्यांचा स्मृतिस्तंभ उभारण्यात येत आहे. या स्मृतिस्तंभाची निर्मिती जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतलेले सुनील चौधरी हे करत आहेत.