|| किशोर कोकणे सहा पोलीस ठाणी नव्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे : मीरा-भाईंदर ते भिवंडी, गणेशपुरी, शहापूर अशी हद्द असलेल्या ठाणे ग्रामीण पोलिसांचा भार आता हलका होणार आहे. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांसाठी नव्याने निर्माण होत असलेल्या पोलीस आयुक्तालयामुळे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातील जवळपास सहा मोठी पोलीस ठाणी नव्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वर्ग होणार आहेत. ठाणे ग्रामीण क्षेत्रात सध्या मीरा रोड, भाईंदर, शहापूर, मुरबाड आणि गणेशपुरी हे विभाग असून एकूण १७ पोलीस ठाणी आहेत, तर सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. भाईंदर आणि मीरा रोड या भागांतील लोकसंख्येने २० लाखांचा आकडा ओलांडला आहे. या भागांत लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यातील ग्रामीण भाग असलेल्या कल्याण, कसारा, टिटवाळा, मुरबाड, शहापूर भागांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गुन्ह््यांचा आलेख वाढू लागला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दाखल होणाऱ्या गुन्ह््यांपैकी ४५ ते ५० टक्के गुन्हे भाईंदर आणि मीरा रोड भागांत दाखल होतात. याशिवाय सकाळ, सायंकाळी फाऊं टन रोड येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्याचा भारही ग्रामीण पोलिसांवर पडतो. यामुळे गेल्या काही वर्षांपासून मीरा रोड, भाईंदर, वसई, विरार या शहरांसाठी वेगळे आयुक्तालय करण्याच्या हालचाली सुरू होत्या. या हालचालींना आता वेग आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच या नव्याने निर्माण होणाऱ्या आयुक्तालयासाठी सदानंद दाते यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेल्या भाईंदर, काशिमीरा, मीरा रोड, नवघर, नयानगर आणि उत्तन पोलीस ठाण्यांचा समावेश नव्या आयुक्तालयातील हद्दीत होईल. यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील गुन्ह््यांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांवर आहे. आता केवळ ११ पोलीस ठाण्यांचा भार ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून सहा पोलीस ठाण्यांचा नव्या पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्यानंतर ठाणे ग्रामीण पोलीस दलात भिवंडी तालुका, गणेशपुरी, कल्याण तालुका, कसारा, किन्हवली, कुळगाव, मुरबाड, पडघा, शहापूर, टोकवडे, वाशिंद या पोलीस ठाण्यांचा भार असेल.