tv16
कल्याण गायन समाज

कोणत्याही शहरासाठी नागरी सुविधा जितक्या आवश्यक असतात, तितकेच  सांस्कृतिक उपक्रमही महत्त्वाचे असतात. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कल्याण शहरात ‘कल्याण गायन समाज’ ही संस्था आठ दशकांहून अधिक काळ कल्याणकरांची सांस्कृतिक अभिरूची संपन्न करीत आली आहे. १९२६ मध्ये गानसूर्य कै. पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेली ही संस्था म्हणजे कल्याणमधील गायन, वादन आणि नृत्य कलांचे महत्त्वाचे केंद्र आहे. कै. काकासाहेब बर्वे आणि इतर संगीतपेमी मंडळींच्या अथक परिश्रमामुळे संस्था अल्पावधीतच नावारूपाला आली. १९३६ मध्ये टिळक चौकात कल्याण गायन समाजाच्या इमारतीचा पाया घातला गेला. त्यानंतर दोनच वर्षांनी या इमारतीत संस्थेने गायन, वादन आणि नृत्य प्रशिक्षणासाठी दिनकर संगीत विद्यालयाची स्थापना केली. येथे गायन, तबला, हर्मोनियम वादन तसेच भरतनाटय़म व कथ्थक नृत्यप्रकार शिकविले जातात. २०१२मध्ये या संस्थेच्या जुन्या इमारतीच्या जागी भव्य व देखणी इमारत उभारण्यात आली. अनेक दिग्गज गायकांच्या मैफलींचे ध्वनिमुद्रण संस्थेच्या संग्रही असून रसिकांना तसेच अभ्यासकांना ते उपलब्ध करून दिले जाते.