३०० चौ. फूट घरांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ; ५०० चौ. फुटांची घरे देण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा विस्तार मुंबई महानगर क्षेत्रातील शहरापर्यंत करण्याचा तसेच मुंबईच्या धर्तीवर ठाणेसह मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २६९ चौरस फुटांऐवजी ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या दोन्ही प्रस्तावांवर निर्णय होणे अपेक्षित असताना राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने आपल्या किमान समान कार्यक्रमात झोपु योजनेअंतर्गत ५०० चौरस फुटांचे घर देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता झोपडीधारकांना नेमके किती मोठे घर मिळते, याकडे लक्ष लागले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये लागू करण्यात येते. मुंबई शहरात झोपू योजनेंतर्गत ३०० चौरस फुटांचे घर लाभार्थीना दिले जाते. मात्र, ठाण्यामध्ये अजूनही हा नियम लागू नसल्यामुळे २६९ चौरस फुटांचे घर दिले जाते. त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी झोपडपट्टीधारक पुढे येत नव्हते. या पाश्र्वभूमीवरठाण्यातही ३०० चौरस फुटांचे घर देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे कार्यालयाने शासनाकडे पाठविला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वीच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नसून हा प्रस्ताव अद्यापही शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, सत्तेत असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आखाडीच्या किमान समान कार्यक्रमात झोपु योजनेत पाचशे चौरस फुटांचे घर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात ३०० चौरस फुटांचे घर देण्यासंबंधी प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर नवे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. योजना विस्ताराचा प्रस्तावही प्रलंबित मुंबई आणि ठाणे शहरामध्ये झोपडपट्टी योजना राबविण्यात येते. झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविण्यासाठी ही योजना राबविण्यात येते. मात्र, या योजनेचा विस्तार मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचा प्रस्तावही राज्य शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.