अंबरनाथ तालुक्यातील मौजे करवले येथे धारदार कुऱ्हाडीने एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या हे कृत्य केले असावे, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर नामदेव भंडारी (वय ६०) फसुबाई शंकर भंडारी (४८) आणि सनी शंकर भंडारी (वय २२) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गुरुवारी पहाटे पाच ते सहा जण भंडारी यांच्या घरात घुसल्याचे काहींनी पाहिले. त्यांनीच दरोड्याच्या उद्देशाने हे हत्याकांड केले असण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन वाघमारे यांच्या नेतृत्त्वाखाली तपास करण्यात येतो आहे. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.