सध्या शहर म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा पूर्वी एक छोटेसे गाव होते. टिटवाळ्यामध्ये असणारे गणपती मंदिर एवढीच या गावाची ओळख होती. कालांतराने गावात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती अस्तित्वात यायला लागली आणि सोयीसुविधांनी    सुसज्ज असे टिटवाळ्याचे शहरात रूपांतर झाले. शहर केवळ भौतिक सोयीसुविधांनी   सुसज्ज असून चालणार नव्हते. शहराची विविध उपक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक ओळख होणे गरजेचे होते. त्यासाठी श्रीकांत देवधर, सुभाष जोशी, महेश्वर धाक्रस, चिंतामणी कुलकर्णी, विवेक पुराणिक, प्रवीण पंडित या कला आणि साहित्याची आवड असणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन जनप्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. १९९१ मध्ये दाजी पणशीकरांची महाभारताची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत होती. या व्याख्यानमालेला येणाऱ्या परिसरातील सुजाण नागरिकांनी ग्रंथालयाची मागणी केली. नागरिकांच्या मागणीवरून २ ऑगस्ट १९९२ रोजी जनप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून पं. वासुदेवशास्त्री पणशीकर सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना झाली. या ग्रंथालयाच्या माध्यमातून टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभव निर्माण झाले.

२ ऑगस्ट १९९२ रोजी २०० पुस्तकांपासून प्रारंभ झालेल्या ग्रंथालयाचे ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते २५ डिसेंबर २००५ रोजी नामकरण करण्यात आले. जनप्रबोधिनी संस्थेने ग्रंथालयासाठी कर्ज काढून जागा विकत घेतली. सुरुवातीला लेखक जयवंत दळवी आणि दादा पणशीकर यांनी दिलेल्या पुस्तकांचा ग्रंथालयाला उपयोग झाला. शासनाने १९९५ मध्ये ग्रंथालयाला मान्यता दिली असून आता ‘अ’ वर्गासाठी ग्रंथालयाचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. सध्या ग्रंथालयात १० हजार ५०० एवढी पुस्तकसंख्या आहे. शैक्षणिक, सामाजिक, चरित्रे, ललित, कादंबऱ्या अशा विविध विषयांवरील पुस्तके ग्रंथालयात पाहायला मिळतात. ग्रंथालयात पुस्तकांच्या देवाणघेवाणीसाठी संपूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले असून ठाणे जिल्ह्य़ातील तिसरे आणि ग्रामीण भागातील पहिले संगणिकीकरण या ग्रंथालयात करण्यात आलेले आहे. वाचकांची आवड लक्षात घेऊन ग्रंथालयात पुस्तकांची खरेदी होत असते. नवीन आणलेल्या पुस्तकांचे ग्रंथालयाच्या जागेतच प्रदर्शन भरवले जाते. वाचकांना आवडलेले पुस्तक ते स्वत: खरेदी करतात. वाचकांचे वाचून झाल्यावर पावती ग्रंथालयात दाखवल्यास त्या पुस्तकाची किंमत सभासदांना देऊन ग्रंथालयाच्या संग्रही ते पुस्तक ठेवले जाते. ग्रंथालयात केवळ पुस्तकांची देवाणघेवाण न राहता वाचन आणि श्रवण या दोन्ही गोष्टींचा उपभोग नागरिकांना घेता यावा यासाठी ग्रंथालयातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. ग्रंथप्रदर्शन ग्रंथालयातर्फे भरवले जाते. बालवाचकांसाठी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत बालवाचनालय सुरू असते. याच वेळी मुलांसाठी छंदवर्ग, वक्तृत्व स्पर्धा प्रशिक्षण आयोजित करून स्पर्धा घेतल्या जातात.

महर्षी व्यास व्याख्यानमाला

ग्रंथालयातर्फे आयोजित केली जाणारी महर्षी व्यास व्याख्यानमाला वाचक सभासदांसाठी विशेष आकर्षण ठरते. या व्याख्यानमालेत विविध मान्यवरांनी सहभाग नोंदवला असून अनेक विषयांवरील व्याख्यानांनी नागरिकांना माहितीपूर्ण ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. सात दिवसांच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने डॉ. यशवंत पाठक, प्रवीण दवणे, डॉ. उल्हास कोल्हटकर, मिलिंद गाडगीळ, कवी नामदेव ढसाळ, दा.कृ.सोमण अशा अनेक मान्यवरांनी व्याख्याने दिली आहेत. याशिवाय राम शेवाळकर, नारायण सुर्वे, मधू मंगेश कर्णिक, शंकर वैद्य, रत्नाकर मतकरी या मान्यवरांनी ग्रंथालयास भेटी दिलेल्या आहेत. परिसरातील नागरिकांना शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने टिटवाळा संगीत सभा आयोजित करण्यात येते. पं. यशवंत देव, बकुल पंडित, फैयाज, शरद जांभेकर आदी कलाकारांनी या संगीत सभेच्या माध्यमातून आपली कला सादर केली आहे. ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात येणार असून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी उपयुक्त सोय उपलब्ध होणार आहे.

तरुणांसाठी किल्ले दर्शन

ग्रंथालयातील तरुण वाचक कथा, कादंबऱ्यांपेक्षा माहितीपर पुस्तकांची मागणी करत असतात. तरुणांमध्ये निसर्गपरिभ्रमण, आकाशदर्शन याविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी ग्रंथालयातर्फे किल्ले भटकंतीचे आयोजन केले जाते.

नारदीय कीर्तन महोत्सव

ग्रंथालयातर्फे दरवर्षी नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पौराणिक, ऐतिहासिक, राष्ट्रीय, सामाजिक, संतचरित्रे या विषयांवर अनेक कीर्तनकारांनी या महोत्सवात कीर्तने सादर केली आहेत.