रविवार मध्यरात्रीपासूनच ठाण्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीच्या कामामुळे गणेशोत्सवापर्यंत ऐरोली आणि आनंदनगर नाक्यांवर खासगी वाहनांना देण्यात आलेली पथकर सवलतीची मुदत संपताच रविवार मध्यरात्रीपासून या दोन्ही नाक्यांवर पुन्हा पथकर वसुली सुरु झाली आहे. सोमवारी सकाळी प्रवाशांच्या वाहनांना दोन्ही नाक्यांवर पथकर भरण्यासाठी थांबावे लागले आणि त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

या मार्गावर वाहतूक संथगतीने सुरु असल्यामुळे नितीन कंपनी ते आनंदनगर नाक्यापर्यंतच्या प्रवासासाठी अर्धा तासाहून आधिक अवधी लागत होता. सायंकाळच्या वेळेतही प्रवाशांना अशाच कोंडीचा सामना करावा लागला. या पथकर वसुलीमुळे प्रवाशांचा आता पुन्हा नित्याचा कोंडीचा प्रवास सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, सकाळच्या वेळेत आनंदनगर नाक्यावर वाहतूक कोंडी झाली असतानाच याच भागात एक कचरा वाहून नेणारे वाहन बंद पडले होते. या वाहनाचा वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन याठिकाणच्या कोंडीत भर पडली.

दुरुस्तीच्या कारणास्तव मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील अवजड वाहतूक ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी शहरातून  वळविण्यात आली होती.

या बदलामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडी होऊ लागली होती. त्यात ऐरोली आणि आनंदनगर नाक्यावरील पथकर वसुलीमुळे वाहने थांबवीली जात होती आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून कोंडीत भर पडत होती. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी राज्य शासनाने दोन्ही टोल नाक्यांवर खासगी वाहनांना महिनाभरासाठी पथकरातून सुट दिली होती. २३ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंतच ही सुट लागू होती. हि मुदत संपुष्टात येताच रविवार मध्यरात्रीपासून दोन्ही नाक्यावरील कंपनीने पुन्हा पथकर वसुली सुरु केली.

या वसुलीमुळे सोमवारपासून प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याचे चित्र दिसून आले.

सोमवारी सकाळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. नितीन कंपनी उड्डाण पुलाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या रांगा पोहचल्या होत्या.

नितीन कंपनी ते आनंदनगर नाक्यापर्यंतच्या प्रवासासाठी दुचाकीने वीस मिनीटे तर कारच्या प्रवासासाठी अर्धा तासाहून अधिक अवधी लागत होता. दहा वाजल्यानंतर मात्र या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाल्याचे दिसून आले.

सायंकाळच्या वेळेत मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने त्यात प्रवाशांची वाहने अडकून पडली.  आनंदनगर ते कोपरी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. ऐरोली टोल नाका परिसरातही सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होऊन त्यात अनेक वाहने अडकून पडल्याचे चित्र होते. गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या प्रवाशांनाही पथकर नाक्यावरील कोंडीमुळे खोळंबून राहावे लागले.

पथकर नाक्यावर धुळीचे साम्राज्य

सोमवारी सकाळी कामानिमित्त मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वारांना आनंदनगर पथकर नाक्यावरील धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागला. या भागात अचानकपणे सकाळी धुळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. रस्त्यांची कामे आणि जवळच असणारा कचऱ्याचा डोंगर यामुळे पथकर नाक्यावर धुळ वाढल्याचे स्थानिक  नागरिकांकडून सांगण्यात आले.

ठाणेकरांसाठी आनंदनगर येथील कोंडी ही नित्याचीच झाली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळित ठेवण्याचा प्रयत्न ठाणे वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे. नागरीकांनी प्रवास करण्यासाठी खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्त वापर करावा. तसेच एकाच ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वेगवेगळ्या खासगी वाहनाने प्रवास करण्यापेक्षा समूहाने शेअर स्वरुपात एकाच वाहनातून प्रवास करावा.

– अमित काळे, पोलीस उपायुक्त,ठाणे वाहतूक

अरुंद कोपरी पूलावरुन होणारी वाहतूक ही प्रामुख्याने आनंदनगर पथकर नाक्यावर होणाऱ्या कोंडीस कारण ठरत आहे. पथकर नाक्यावर होणारी कोंडी दूर करण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या उपाययोजना सुरु आहेत. त्यासाठी निरनिराळे अभ्यासपूर्ण प्रस्ताव देखील  महापालिकांकडे सादर करण्यात आले आहेत.

– जयंत म्हैसकर, एमईपी अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tolls at anandnagar and airoli toll plazas begin on monday
First published on: 25-09-2018 at 03:02 IST