पर्यटन विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आराखडा तयार; गावांतील समस्या दूर होणार? स्वातंत्र्यकाळापासून उपेक्षित असलेल्या वसई खाडीतील पाणजू बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. मंगळवारी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आराखडा तयार करण्यासाठी बेटाची पाहणी केली. पाणजू बेट पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास गावातील अनेक समस्या दूर होतील. रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. वसई खाडीतील भाईंदर आणि नायगाव यांच्यामध्ये पाणजू नावाचे बेट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणजू बेटाचा विकास झाला नव्हता. या बेटावर जाण्यासाठी बोटीतून जावे लागते. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत होती. पर्यटनस्थळ नीती आयोगाने देशामधील बेटांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात एकूण १ हजार ३८२ बेटे आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ बेटांचा विकास केला जाणार आहे. या २६ बेटांच्या यादीत वसई तालुक्यातील पाणजू बेटाची निवड करण्यात आलेली आहे. पाणजू बेटाच्या विकासासाठीचा आरखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर व कोकण विभागीय आयुक्त यांनी पाणजू गावाला मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. बेट समग्र विकास (हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ आयलँडस प्रोग्राम) या कार्यक्रमांतर्गत या बेटाचा पर्यटन विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे. बेटाचा विकास कशा प्रकारे करण्यात येईल हे आराखडा तयार झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सोयीसुविधांवर भर देण्यात येणार आहे. पाणजू गावाच्या विकासाच्या व सोयीसुविधा याच्या दृष्टीने तशा प्रकारचा आराखडाही तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे गावाचे सरपंच आशीष भोईर आणि ग्रामस्थांनी सांगितले. पाणजू बेट पर्यटनस्थळ झाल्यास येथील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय या बेटावर विकासात्मक कामे मार्गी लागतील, अशी आशा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. पाणजू बेटावर पर्यटनाच्या दृष्टीने विविध संधी उपलब्ध आहेत. चांगल्या प्रकारची जागाही या गावात उपलब्ध असल्याने पर्यटनासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि डीपीसीच्या माध्यमातून निधीही चांगल्या प्रकारे येईल, तसेच या गावाला चांगल्या सोयीसुविधाही उपलब्ध होतील. - डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर पर्यटनामुळे ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोकण विभागाच्या वतीने पाणथळ जागांचे संवर्धन होण्यासाठी संकल्पना तयार केली असून लोकसहभागातून पाणथळ जागांचे संवर्धन करता येईल. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ातून एक जागा निवडण्यात आली आहे. त्यामध्ये पालघर जिल्हय़ातून पाणजू बेट निवडले आहे. या बेटाचा विकास हा नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणून करण्यात येईल. - जगदीश पाटील, कोकण विभागीय आयुक्त