कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शनिवारी दुपारपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. काटई नाका ते डोंबिवली हे १५ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनांना तब्बल दीड तासांचा कालावधी लागत होता. शिळफाटालगतच्या रस्त्यावर अपघात झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.

शिळफाटा रस्ता वाहनांनी जाम झाल्याने आजूबाजूच्या सेवारस्त्यांनी काही वाहने पुढचा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करू लागली. मोठय़ा संख्येने वाहने सेवा रस्त्यावरून ये-जा करू लागल्याने, मुख्य रस्त्याबरोबर सेवारस्तेही वाहनांनी गजबजून गेले. दोन्ही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने वाहने, प्रवासी जागोजागी अडकून पडले होते.

अपघात झालेल्या ठिकाणचे वाहन रस्त्याबाहेर काढण्यासाठी क्रेन लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणची वाहतूक थांबविण्यात आली होती.