ऋषिकेश मुळे

तोडलेल्या झाडांवर होलिकोत्सव मंडळांचा डल्ला

ठाण्यात मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी महामार्गालगतच्या अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. होलिकोत्सव जवळ आल्यामुळे उत्सव मंडळांचा या वृक्षतोडीवर डोळा आहे. तोडलेल्या झाडांच्या फांद्या गोळा करताना मंडळांचे कार्यकर्ते दिसू लागले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील झाडांची संख्या घटू लागल्यामुळे होळीसाठी लाकडे गोळा करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना बरीच पायपीट करावी लागे. यंदा मेट्रोच्या बांधकामासाठी शहरातील महामार्गालगतची ४७८ झाडे तोडण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी असली, तरी होलिकोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे मात्र फावले आहे. मेट्रो मार्गातील काही वृक्षांची तोडणी सुरूही झाली आहे. या झाडांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरेपण करण्यात येणार असले, तरी तोडणीदरम्यान फांद्या रस्त्यांलगत पडत आहेत. अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या फांद्या होळीसाठी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. खाली पडलेली लाकडे वाढत्या उन्हामुळे बऱ्यापैकी सुकली आहेत. बहुतेक मंडळांनी परिसरातील शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या कामासाठी जुंपले आहे. फांद्या सायकलवर लादून घेऊन येणारी ही मुले ठिकठिकाणी दिसू लागली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात येणाऱ्या वडाळा-घाटकोपर-ठाणे या ३२.३२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो प्रकल्पात सुमारे चार हजार ३८८ झाडे बाधित होत आहेत.

ठाण्यातील मुलुंड चेकनाका एलबीएस मार्ग येथून तीन हात नाका जंक्शनपर्यंत आणि तीन हात नाका ते कासारवडवली दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. मुलुंड चेकनाका- एलबीएस मार्ग आणि पुढे तीन हात नाका ते माजिवडा (वागळे- वर्तकनगर बाजूकडील) दरम्यान सुरू असणाऱ्या बांधकामावेळी ४७८ झाडे तोडण्यात येणार आहे, तर ७२ झाडांच्या फांद्या छाटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापैकी काही झाडांची कत्तल करण्यात आली असून त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जंगलात जाऊन अनधिकृतरीत्या झाडे तोडून होळीसाठी लाकूड आणण्यापेक्षा शहराच्या मध्यवर्ती भागात आयतीच उपलब्ध झालेली लाकडे होळीसाठी आणणे सोयीस्कर ठरत असल्याचे काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तीन हात नाका जंक्शन ते कॅडबरी जंक्शनदरम्यान ही तोडलेली झाडे दिसत आहेत. घोडबंदर, किसननगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, ठाणे शहर आणि कोपरी या भागातील उत्सव मंडळे लाकडे घेऊन जाण्यासाठी तिथे गर्दी करून लागली आहेत. याविषयी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकारी अनुराधा बाबर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मोठी माणसे दिवसभर कामाला जातात. त्यामुळे ते होळीची तयारी करू शकत नाहीत. आम्ही मुले शाळा सुटल्यानंतर एकत्र जमतो. त्यानंतर सायकलने सगळे नितीन जंक्शनला जाऊन तेथून होळीसाठी लाकडे घेऊन येतो.

– अनुज चवाथे, शालेय विद्यार्थी