नडगाव - डोंगरीपाडा, तालुका शहापूर रस्ते,दळणवळणाच्या सुविधांचा वाणवा आणि प्रशासकीय यंत्रणाची अनास्था यामुळे गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेल्या शहापूर सारख्या ग्रामीण भागातील आदीवासी समाजातील कातकरी समाज न्याय हक्कांसाठी झगडत आहे. अशा समाजाला एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी शेती हा एकमेव उपाय ओळखून आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने या समाजासाठी शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली आहे. याच योजनांचा लाभ घेत नडगाव-डोंगरीपाडा वस्तीतील सुमारे ४० हून अधिक कुटुंबांनी शेतीची सुरुवात केली. गेल्या वर्षभरापासून त्यांचा हा शेतीचा उपक्रम सुरू असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात सितारा मिरची, ढोबळी मिरची आणि झेंडूची विक्री करू लागली आहे. शासकीय योजनांच्या मदतीने कातकर वाडीमध्ये आता आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या असून ही वस्ती आता नीटनेटक्या गावाच्या दिशेने प्रगती करू लागली आहे. आदिवासी समाजामधील अत्यंत दुर्लक्षित असलेला कातकरी समाज शासकीय योजनांचे लाभार्थी होण्याची संधी तशी क्वचितच मिळते. त्यांच्या सततच्या स्थलांतरामुळे मुलांना शिक्षणाची संधी नाही आणि शासकीय योजनांचा फायदाही घेता येत नाही. अशा समाजाला एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी शेती हा एकमेव उपाय ओळखून आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने या समाजासाठी शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली आहे. याच योजनांचा लाभ घेत नडगाव-डोंगरीपाडा वस्तीतील सुमारे ४० हून अधिक कुटुंबांनी शेतीची सुरुवात केली. गेल्या वर्षभरापासून त्यांचा हा शेतीचा उपक्रम सुरू असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात सितारा मिरची, ढोबळी मिरची आणि झेंडूची विक्री करू लागली आहे. शासकीय योजनांच्या मदतीने कातकर वाडीमध्ये आता आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या असून ही वस्ती आता नीटनेटक्या गावाच्या दिशेने प्रगती करू लागली आहे. पिण्याचे पाणी, प्राथमिक शाळा, पक्के रस्ते, पक्की घरे, शेती आणि आरोग्य सुविधांचा पुरवठा या गावाला होऊ लागला असला तरी अधिक विकसित होण्यासाठी येथील मंडळींचा प्रयत्न सुरू आहे. शासनाच्या विविध आदिवासी विकास प्रकल्प योजनांतून परिसराचा विकास होईल अशी अपेक्षा येथील रहिवासी व्यक्त करत आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना आसनगाव स्थानकात उतरून शहापूर या तालुक्याच्या ठिकाणी जाता येते. तेथूनच सुमारे २२ किमी अंतरावर किन्हवरे हे एक मोठे गाव आहे. तेथून पुढे दहा किमी अंतरावर नडगाव डोंगरीपाडय़ाची कातकरी वस्ती आहे. एसटी किंवा वाहतूक करणाऱ्या जीपमधून डोंगरीपाडय़ाकडे जाणाऱ्या फाटय़ावर उतरून पुढे जवळपास तीन किमी कच्च्या रस्त्याने डोंगरीपाडय़ाच्या वस्तीवर पोहोचता येते. डोंगरीपाडा म्हटल्यावर डोंगरकपाऱ्यांमध्ये ही वस्ती असेल अशी येथे येणाऱ्याची अपेक्षा असली तरी डोंगरीपाडा ही वस्ती अत्यंत सखल भागावर वसलेली आहे. पाडय़ावर प्रवेश करतानाच एक पाण्याची विहीर लागते. पाण्याने भरलेली ही विहीर पाहिल्यानंतर गावामध्ये पाण्याची सुबत्ता असल्याचे वाटते, मात्र तेथे लावलेल्या एका फलकावर विहिरीचे पाणी प्रदूषित असल्याची सूचना वाचल्यानंतर परिसरात पाण्याच्या टंचाईची भीषणता जाणवते. वाडीपर्यंत पोहोचण्यासाठी कच्चा रस्ता असला तरी वाडीमध्ये अनेक ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा घरांची रांग असून ही घरे पक्क्या विटाने तर काही घरे कारवीच्या कुडापासून बनवलेली दिसतात. कुडाची घरे असली तरी येथील प्रत्येक घरामध्ये टीव्ही असून सॅटेलाइटच्या माध्यमातून सगळ्या वाहिन्या इथे पाहण्यास मिळतात. मुंबईपासून साधारण शंभर किमीवर असलेल्या या पाडय़ामध्ये आधुनिक यंत्रणांचाही शिरकाव झाला असून मोबाइल आणि लॅपटॉप वापरणारे तरुणही इथे आहेत. डोंगरीपाडय़ाचे लोकजीवन.. नाडगाव-नांदगाव आणि डोंगरीवाडी या तीन गावांची ही ग्रुप ग्रामपंचायत असून त्यापैकी डोंगरीवाडी येथे ६० घरे असून त्यात सुमारे ४०० च्या आसपास लोकसंख्या आहे. १०० टक्के कातकरी सामाजाची वस्ती असलेल्या या पाडय़ावर पूर्वी ७५ टक्के रोजगारासाठी स्थलांतर होत होते. या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दाजी तुळशीराम वाघ हे असून हे याच डोंगरीपाडय़ाचे रहिवासी आहेत. पाडय़ातील सरपंच असल्याने पाडय़ाकडे अनेक शासकीय योजनांचा ओघ वाढला आहे. शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध योजना या भागात राबवण्यास सुरुवात करण्यात आली. अदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय जाधव यांनी या भागात अनेक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत येथील रहिवाशांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. सुमारे १० लाखांचा निधी देऊन या भागातील २० जणांच्या गटाला सितारा मिरची आणि शिमला मिरचीची लागवड करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. वस्तीच्या अवघ्या काही अंतरावर असलेल्या काळू नदीच्या पात्रातून पाणी घेऊन ही शेती बहरली. सुमारे तीन हजारांहून अधिक सितारा मिरची, शिमला मिरची आणि झेंडूचे उत्पन्न घेऊन त्याची कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात विक्री करण्यात आली. येथील रहिवाशांचे हे काम लक्षात घेऊन ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजनेतून परिसरातील रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. तर येथील काही रहिवाशांसाठी घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. शेती सुरू झाल्यामुळे या भागातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक स्थलांतर पूर्णपणे थांबले असल्याची माहिती गावचे सरपंच दाजी वाघ सांगतात. डोंगरीपाडा गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून येथील मुलांची संख्या सुमारे ६० ते ७० च्या आसपास आहे. तर पुढील शिक्षणासाठी मुलांना माध्यमिक शाळेसाठी सोहगाव येथे जावे लागते. त्यानंतरच्या शिक्षणासाठी किन्हवरे गावातील महाविद्यालयात जावे लागते. जयवंत वाघ हा तरुण या पाडय़ातील पहिला पदवीधर तरुण असून किन्हवरे येथे तो नोकरी करतो. येथील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. मुले शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असून अधुनिक गोष्टींचे आकर्षण त्यांच्यामध्ये वाढू लागले आहे. कातकरी समाजाच्या या गावामध्ये दारूबंदी आहे. सध्या पाडय़ाचा चांगला विकास होत असला तरी हा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होण्याची गरज आहे. शहराप्रमाणे नव्हे, मात्र एक चांगले गाव म्हणून हा परिसर ओळखला जावा असे मत येथील तरुण अरुण वाघ सांगतो. पूर्वी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नसल्याने नागरिकांना नेमके काय करायचे असा प्रश्न होता. त्यामुळे बेरोजगारी आणि भटकणे सुरू होते. मात्र शासकीय योजना राबवण्यास सुरुवात झाल्यापासून या सगळ्या गोष्टी थांबल्या आहेत. समाज मंदिरामध्ये एकत्र येऊन समाजाच्या महत्त्वाचे सण साजरेकेले जातात.शेतीमुळे प्रत्येक कुटूंबाला आवश्यक आर्थिक लाभ होऊ लागल्याने गावातील स्थलांतर कमी झाले आहे, असे येथील निराबाई वाघ सांगतात. अजूनही विकास हवा.. डोंगरीपाडय़ाजवळून काळू नदी वाहते. त्यावर गावाची पाणीपुरवठा टाकी असून तेथून पाडय़ाला पाणीपुरवठा होतो, मात्र प्रत्येक घरापर्यंत नळाची व्यवस्था झाली तर गावात पाण्याच्या दृष्टीने सुबत्ता येऊ शकेल. सध्या हंडे घेऊन नदी परिसरातून आणि विहिरीवरून महिलांना पाणी आणावे लागते. गावासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र झाल्यास नागरिकांची चांगली सोय होऊ शकते. तसेच मुख्य रस्त्यापासून पाडय़ापर्यंत येणाऱ्या रस्त्याची स्थिती चांगली सुधारण्यात यावी, अशा अपेक्षा येथील रहिवाशांच्या आहेत. श्रीकांत सावंत