कल्याणमधील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याबरोबरच त्यांची नव्या पिढीला माहिती करून देण्याच्या उद्देशाने ‘कोकण इतिहास परिषदे’च्या कल्याण शाखेने विद्यार्थी, नागरिकांसाठी दर रविवारी एक तासाचा ‘हेरिटेज वॉक’ सुरू केला आहे. या दर्शन सहलीत विविध ऐतिहासिक वास्तूंची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येते. शनिवारी या दर्शन सहलीचा शुभारंभ होईल.मुंबई आणि पुणे येथे ऐतिहासिक वास्तू दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. याच धर्तीवर कल्याणमध्ये हा उपक्रम राबवण्यात येईल. कोकण इतिहास परिषदेचे मोहन पिंपळखरे, राजेश पासलकर, डॉ. श्रीनिवास साठे, गायकवाड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ऐतिहासिक काळात कल्याण शहराला सहा हजार ३०० फुटांची तटबंदी होती. टिळक चौक, घास गल्ली, अन्सारी चौक, उर्दू हायस्कूल, पारनाका तटबंदीत नऊ बुरूज, सहा भव्य दरवाजे होते. सध्या शहरात ४२ ऐतिहासिक वास्तू आहेत. शारदा मंदिर शाळेच्या पाठीमागे तटाचा काही भाग आजही दिसतो. या वास्तूंमध्ये वाडे, मोहल्ले, बुरूज, मंदिरे, अग्यारी, विहिरी, तलाव यांचा समावेश आहे. वासुदेव फडके यांचे आजोळ कल्याणमध्ये होते. मोहल्ल्यातील शाही बावडीतून विजापूरच्या आदिलशहाला पाणी पोहचविण्यात येत असे. सुभेदारवाडा, सरकारवाडा, बोरगावकरवाडा, धुरूवाडय़ांचे अवशेष आजही शहरात आहेत. त्यांची रचना इंडो पोर्तुगीज वास्तुरचनेप्रमाणे आहे. नागरीकरणाच्या झपाटय़ात कल्याणमधील जुने ऐतिहासिक अवशेष नामशेष होत आहेत.कल्याण परिसरातील ५० शाळांना ‘हेरिटेज वॉक’मध्ये सहभागी होण्यासाठी पत्रे देण्यात आली आहेत. आजवर विद्यार्थी, नागरिकांच्या पाच पदयात्रा काढण्यात आल्या आहेत. सकाळी सहा ते सात असा एक तासाचा ‘हेरिटेज वॉक’ असतो. पर्यटनाची संधी हा दर्शन सहलीतील एक भाग आहे. यासोबत रोजगारही उपलब्ध होईल. -राजेश पासलकर, सहल संयोजककल्याण दर्शन अंबरनाथचे शिवमंदिर, टिटवाळ्याचे श्री महागणपती मंदिर, शहाडचे बिर्ला मंदिर, भिवंडीजवळील लोनाडचा किल्ला, अंजूरचे पुरातन गणपती मंदिर, दुर्गाडी किल्ला अशी ठिकाणे कल्याण दर्शनच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हा उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे, असे साठे यांनी सांगितले.