भीषण पाणी टंचाईमुळे जलसंधारणाचे महत्त्व पटलेल्या अनेकांनी आता आपापल्या परीने येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. कल्याणच्या आधारवाडी परिसरातील त्रिवेणी गार्डन त्यापैकीच एक. पिण्याव्यतिरिक्त इतर कामांना लागणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी संकुल परिसरात पडणारे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीखाली मुरविण्याचा सोसायटी सदस्यांचा प्रयत्न आहे..

त्रिवेणी गार्डन, आधारवाडी, कल्याण पश्चिम

राज्यात पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. बहुतेक धरणांनी तळ गाठला आहे. ठाणे परिसरातील शहरांमध्ये ५० ते ६० टक्के पाणीकपात आहे. ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक वाईट अवस्था आहे. त्यामुळे या पाणी टंचाईच्या काळात आता जल संवर्धनाचे उपाय योजले जाऊ लागले आहेत. काही शहरांमध्ये वसाहतींनी पाणी साठवण प्रकल्प राबविले आहेत. कल्याण शहरातील त्रिवेणी गार्डन या वसाहतीनेही पर्जन्य जलसंधारण प्रकल्पांतर्गत जलसंचय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाहीही सुरू झाली आहे.
कल्याण पश्चिम विभागात आधारवाडी परिसरात चार वर्षांपूर्वी त्रिवेणी गार्डन ही निवासी वसाहत उभी राहिली. या १५ मजली गृहसंकुलात ८८ सदनिका आहेत. त्रिवेणी गार्डन हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे मुबलक सुख-सुविधा आहेत. शहरातील इतर विभागांच्या तुलनेत येथे महापालिका परिवहन सेवा तसेच रिक्षा सेवा मुबलक प्रमाणात उरलब्ध आहेत. त्रिवेणी गार्डन संकुल एक एकरच्या आसपास जागेवर उभारण्यात आले आहे. आठ वर्षांपूर्वी संकुलाचे काम सुरू झाले आणि चार वर्षांपूर्वी रहिवासी येथे राहायला आले. संजय मेहता या विकासकाने ही टोलेजंग इमारत उभारली आहे
मुबलक सुविधा
१५ मजली टॉवर असल्याने सुविधा आणि सुरक्षेची उपाययोजनाही चांगली आहे. यदाकदाचित वीजप्रवाह खंडित झाल्यास पॉवर बँक असल्याने लिफ्टवर काही परिणाम होत नाही. अग्निशमन यंत्रणेसाठी दोन मजले रिकामे ठेवण्यात आले आहेत. यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही याची चाचपणी वेळोवेळी केली जाते. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच दोन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यांना राहण्यासाठी खोलीही आहे. जिमखाना, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, उद्यान यासह क्लब हाऊस, जिमखाना तसेच वाहनतळाचीही सुव्यवस्था येथे आहे. बाहेरील वाहने आणि सभासदांची वाहने ओळखण्यासाठी संकुलाच्या सभासदाच्या वाहनावर विशिष्ट स्टीकर चिकटवण्यात आली आहेत. स्टीकर असलेल्या वाहनांनाच संकुलात प्रवेश मिळू शकेल, असे र्निबध घालण्यात आले आहेत. दुचाकी आणि चारचाकीसाठी स्वतंत्र वेगवेगळी जागा करण्यात आली आहे. वाहनांची संख्या वाढल्यास बहुमजली वाहनतळ उभारण्यात येईल, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष विजय सूचक यांनी दिली.
कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प
पर्जन्य जलसंधारण प्रकल्पानंतर त्रिवेणी सोसायटीमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापनही केले जाणार आहे. संकुलात मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होतो. सध्या तो महापालिकेच्या घंटागाडीमार्फत पाठविला जातो. ओला आणि सुका असे कचऱ्याचे विघटन करून ओल्या खतापासून गांडुळ खत निर्मिती तर सुका कचरा पुनर्वापरासाठी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सामाईक वापराच्या विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याची योजना आहे. सध्या एलईडी दिवे लावून विजेची बचत करण्यात संकुलास यश आले आहे, अशी माहिती किर्पेकर यांनी दिली. सांडपाणी पुनर्वापर योजनाही विचाराधीन होती. मात्र जागेअभावी तो प्रकल्प साकारू शकलो नाही, अशी माहिती आशीष जोशी यांनी दिली. येत्या पावसाळ्यात संकुल परिसरात निरनिराळ्या फळ आणि फुलझाडांची लागवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
संदेश-संवादासाठी व्हॉट्सअप
सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने त्याचा पुरेपूर वापर सर्वत्र होताना दिसतो आहे. त्रिवेणी गार्डन संकुलात सर्वाकडे इंटरनेट आणि वायफायची सुविधा असल्याने संकुलाने व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या केवळ त्रिवेणी गार्डन सभासदांचा ग्रुप स्थापन केला असून त्याद्वारे संवाद साधणे सुरू आहे. कोणतेही समस्या असेल ती या अ‍ॅपवर टाकल्यास ती चुटकीसरशी सुटत असल्याचा अनुभव येथील सभासदांना आहे. कार्यक्रम असो, वार्षिक सभा असो अ‍ॅपवर त्या पोस्ट केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. चांगल्या कामाबद्दल आम्हाला रहिवाशांकडून नेहमीच कौतुकाची थाप आम्हाला मिळते. पर्जन्य जलसंधारण प्रकल्प राबवायला घेतल्यावर प्रत्यक्ष आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कौतुकाचा वर्षांव झाला असल्याचे प्रशांत भामरे यांनी सांगितले.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात
संकुलात वर्षभरात येणारे सण, उत्सव उत्साहात साजरे केले जातात. प्रजासत्ताक दिन, होळी, रंगपंचमी, दहीहंडी, स्वातंत्र दिन आदी सण साजरे होतातच परंतु गणेशोत्सव, नवरात्रौत्सव या उत्सवाचा आनंद हा वेगळाच असतो. या उत्सवात रहिवासी कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न असतो. या उत्सवात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल असते. मुलांसह त्यांचे पालकही यामध्ये सहभागी होतात.
क्षेपणभूमीची समस्या
संकुलापासून काही अंतरावर आधारवाडी क्षेपणभूमी असल्याने त्याची दरुगधी नेहमी येथील रहिवाशांना सतावत असते. या दरुगधीचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. याबाबतच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या. मात्र तरीही ही समस्या अद्याप मिटलेली नसल्याचे अविनाश विद्वांस यांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ती भागात त्रिवेणी गार्डन संकुल असल्याने रुग्णालये, महाविद्यालये, मॉल, दुकाने, वाहतूक व्यवस्था, पोलीस सुरक्षाव्यवस्था, करमणुकीची साधने या सुविधांची कमतरता येथे नाही.

पर्जन्य जलसंचय
गेल्या वर्षी पाऊस न पडल्याने पाणीटंचाईचा फटका कल्याण शहरलाही बसला आहे. भविष्यात पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी त्रिवेणी सोसायटीने पर्जन्य जलसंधारण प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लागणारा खर्च करण्यास सर्व सभासदांनी मान्यता दिली आहे. संकुलातील रहिवासी चांगल्या कामासाठी कोणतीही आडकाठी न ठेवता सहकार्य करीत असतात, असे सचिव अलंकार किर्पेकर यांनी सांगितले. केदार पोंक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प कार्यान्वित होत असून या प्रकल्पातून या पावसाळ्यात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे पाणी पिण्याव्यतिरिक्त झाडांफुलांना तसेच इतर कामांसाठी वापरले जाईल, अशी माहिती विजय सूचक यांनी दिली. महापौरांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.
सुहास धुरी suhas.dhuri@expressindia.com