नवी दिल्ली : मलेशियात अपहरण झालेल्या डोंबिवलीतील रोहन आणि कौस्तुभ वैद्य या भावांची सुखरूप सुटका करण्यात परराष्ट्र खात्याला यश आले आहे.

व्यावसायिक कामानिमित्त हे दोघे मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर येथे गेले होते. तिथे त्यांचे २ ऑगस्ट रोजी अपहरण करण्यात आले. यासंदर्भात वैद्य कुटुंबीयांनी परराष्ट्र  मंत्रालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता.

अपहरणाची माहिती मिळताच परराष्ट्र खात्याने तेथील भारतीय उच्चायुक्तांना कळवले. त्यांनी मलेशियातील पोलिसांकडे गुन्हा नोंदवला.

मलेशियातील पोलिसांनी तातडीने तपासकार्य हाती घेतले. त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तालयातील व्यक्तीही मदतीला देण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दोघा भावांची सुखरूप सुटका झाली. अपहरणकर्त्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.