ठाणे : भिवंडी येथील मानकोली उड्डाणपुलाजवळ मंगळवारी रात्री चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाले. विशाल भोये (२७), अमोल वाबळे (२८) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर शामा देशमुख या अपघातात जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल, अमोल आणि शामा हे तिघेही कामानिमित्ताने नाशिकहून मुंबईत कारने आले होते. मंगळवारी रात्री घरी परतत असताना विशाल कार चालवत होता. ते मानकोली उड्डाणपुलाजवळ आले असता विशालचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यांची कार रस्त्यामधील दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेकडील रस्त्यावर असलेल्या एका खासगी बसला आदळली. हा अपघात इतका भीषण होता की विशाल आणि अमोलचा यात जागीच मृत्यू झाला. तर शामा देशमुख या अपघातात गंभीर जखमी झाल्या. नागरिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने तिला ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी खासगी बसचालकाने दिलेल्या

माहितीनुसार अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी विशाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.