कल्याण-डोंबिवली शहराचा अस्वच्छतेच्या बाबतील प्रथम क्रमांक लागला आहे. हा बट्टा पुसून काढण्यासाठी शिवसेनेने ही योजना आखली आहे. ज्यांना वाटते की हे शहर माझे आहे, त्या सगळ्यांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. उद्या कोणी म्हणेल की, तुम्ही आम्हाला सहभागी करून घेतले नाही. टीकाकारांनी टीका करत या कामात अडवणूक करण्यापेक्षा हातात हात घालून काम करावे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे भाजपला लगावला.शिवसेनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली शहरात स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. डोंबिवली जिमखाना येथे उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, जनतेने जशी आम्हाला मते दिली आहेत, तशी तुम्हालाही मते दिली आहेत. आपल्या शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल नंबर कसा येईल याचा सर्वानी सभागृहात टीका करण्यापेक्षा विचार करावा. हातात हात घालून काम केले तर पाच वर्षे वाट न पाहता एका वर्षांतच आपले शहर स्वच्छ होऊन ज्यांनी शहराचा अस्वच्छतेच्या यादीत समावेश केला आहे. तेच येथे येऊन सेल्फी काढतील असे ते म्हणाले.