मुंबई आणि उपनगरांतल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या माथेरान येथील डोंगरांवर वणवे रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मानवविरहित वणवा प्रतिबंधक प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. सगुणा रूरल फाऊंडेशनच्या माध्यमातून माथेरानच्या मार्गावरील नांगरखिंडी डोंगरावर वाळा, खरशिंगी, ताड, शिंदी आणि करवंदासारखी झाडे लावून वणवे रोखण्यात आले आहेत. त्यामुळे येथील जैवसाखळी अबाधित राहत असून डोंगरात पाण्याचे झरेही जिवंत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी हक्काचा चारा मिळतो आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत लागणाऱ्या वणव्यांमुळे मोठी वनसंपदा राख होत असून जंगलातील जैव साखळीही धोक्यात येत असल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यात गवत आणि झुडपांमुळे हिरवेगार होणाऱ्या डोंगराला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला काही अज्ञात आग लावतात. त्यामुळे संपूर्ण डोंगर काळे होतात. यावर वन विभागाच्या वतीने काही ठोस उपाययोजना करताना दिसून आले नाही. जाळपट्टी काढणे हा एवढाच उपाय वन विभागाकडून केला जातो. त्यामुळे वन विभागाकडे मानवविरहित वणवा रोखण्याची कोणतीही यंत्रणा नाही. मात्र माथेरानच्या डोंगरावर वणवे रोखण्याचा मानवविरहित यशस्वी प्रयोग राबवण्यात सगुणा रूरल फाऊंडेशनला यश आले आहे. तीन वर्षांपूर्वी माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या नांगरखिंडी आणि आसपासच्या तीन डोंगरांवर वणवा प्रतिबंधक उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. पावसाचा जोर की झाल्यानंतर वाढलेल्या गवताच्या एका पट्ट्यावर तण नाशक फवारून तेथील गवत मारले जाते. त्यामुळे आगीशिवाय जाळपट्टी तयार होते. कुजलेल्या गवतामुळे गांडूळ तयार होऊन पाणी मुरण्यास सुरुवात होते. येथे जीवाणूंची वाढ होत असल्याने मातीची सुपीकता वाढते. तर जाळरेषेच्या दोन्ही बाजूला देशी झाडा-झुडपांची लागवड केल्याने येथे एक झाडांचीच भिंत उभी राहते. यात कुणीही वणवा लावल्यास तो वणवा जाळपट्टी आणि या झाडाझुडपांमुळे निष्प्रभ ठरतो. आग रोखली गेल्याने डोंगराचा मोठा भाग वाचतो. अवघ्या काही भागावर वणव्याचा परिणाम जाणवतो. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रयोग माथेरानच्या डोंगरांवर यशस्वी होतो आहे. येथील वणवे थांबल्याने मोठ्या प्रमाणावर गवत टिकून राहिले असून त्यामुळे या भागात अनेक ठिकाणी डोंगराला पाण्याचे झरे लागले आहेत. हे झरे एप्रिलपर्यंत जिवंत राहतात. तर जैवसाखळीही टिकण्यात यश मिळते आहे. टाळेबंदीच्या काळात माथेरानचे घोडे, येथील शेतकऱ्यांची जनावरे याच गवतावर गुजराण करत असल्याचे सगुणा रूरल फाऊंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे यांनी सांगितले आहे. हक्काचा चारा मिळाला डोंगरावरचे वणवे नियंत्रित करता आल्याने नांगरखिडींच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर गवत टिकते. त्याचा फायदा परिसरातील शेतकरी, घोडेवाले यांना होतो आहे. घरची जनावरे यात गवतावर अवलंबून असून गेल्या काही वर्षांपासून आम्हाला चारा मिळू लागल्याने आमचा खर्च वाचल्याचे येथील शेतकरी मनोज गोरे सांगतात.